केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन : बेंगळुरातील हॉटेल ताज वेस्टेंडमध्ये संवाद कार्यक्रम
प्रतिनिधी / बेंगळूर
गरिबांच्या घरापर्यंत सर्व सुविधा पोहोचविण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. बेंगळुरातील हॉटेल ताज वेस्टेंडमध्ये रविवारी आयोजित आर्थिक अवलोकन, आत्मविश्वास भारतासाठी आत्मनिर्भर अर्थसंकल्प संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सीतारामन पुढे म्हणाल्या, उज्ज्वला, स्वनिधी, मुद्रा, जनऔषधी, किसान सम्मान योजनांद्वारे केंद्र सरकारने गरिबांच्या समस्यांचे निवारण करण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. यापूर्वी भारत म्हणजे पायाभूत सुविधांची कमतरता असलेला देश होता. पण आता भारत हा आत्मनिर्भरच्या दिशेने वाटचाल करत असून पायाभूत सुविधांनी युक्त असा देश ठरला आहे. यापूर्वीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने स्थिर प्रशासन देण्यासाठी प्रयत्न केले होते, असे त्यांनी सांगितले.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 8 कोटी गरिबांना मोफत गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे. तसेच या अर्थसंकल्पात पुन्हा एक कोटी पात्र असणाऱया गरीबांना मोफत गॅस सिलिंडरची सुविधा पुरविण्याचा पुढाकार घेण्यात आला आहे. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले असले तरी गरिबांना याचा कोणताही फायदा झाला नाही. आधार क्रमांक मोबाईलला जोडून जनधन योजना हाती घेतल्याने खऱया गरीबांना या योजनेचा लाभ होत आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.
विकासासाठी खासगीकरण आवश्यक
लघु आणि मध्यम उद्योगपतींवर विश्वास ठेवणारे आणि ‘सब का साथ सबका विकास’ या विचारांतर्गत देशाचा विकास साधणारे आमचे सरकार आहे. रोजगार निर्मितीच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन देशाची प्रगती करण्याचा पुढाकार घेण्यात आला आहे. चांगल्याप्रकारे काम न करणाऱया सार्वजनिक संस्था कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी व देशाच्या विकासासाठी त्यांचे खासगीकरण आवश्यक आहे. दीर्घावधी विकासाच्या दृष्टिने अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
दरम्यान, संवाद कार्यक्रमात सहभागी झालेल्या मंत्र्यांनी कोणत्याही समस्या असल्यास आपल्या निदर्शनास आणावे. आपण त्याकडे विशेष लक्ष देऊन समस्या सोडवू, असेही आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी समील कागलकर, विश्वनाथ भट, किरण जवाजे आदी उपस्थित होते.