चिपळुणात वाशिष्ठी पूल, एक कोसळलेले घर पाहिले
प्रतिनिधी/ चिपळूण
महापूर व अतिवृष्टीने भूस्खलन यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 3 सदस्यीय केंद्रीय पथक मंगळवारी सायंकाळी 4 वाजता येथे दाखल झाले. मात्र वाशिष्ठी पुल, कोसळलेले एक घर पाहिले आणि प्रशासनाकडून आढावा घेत पथक निघून गेले. तब्बल अडीच महिन्यांतर आलेल्या केंद्रीय पथकाने ना कुणाची भेट ना चर्चा केल्याने शहरवासियानी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
22 जुलैच्या महापुरात शहर आणि परिसरात असंख्य संसार उद्ध्वस्त झाले. राज्याकडून उशिरा का होईना तातडीची मदत मिळाली. मात्र केंद्राकडून काहीच मदत मिळालेली नाही. असे असतानाच केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संचालक अभेय कुमार, केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्रा, केंद्रीय ग्रामीण विकास विभाचे सहाय्यक आयुक्त आयुष पुनिया यांचे त्रिसदस्यीय केंद्रीय पथक मंगळवारी पूरग्रस्त चिपळूणच्या दौऱयावर आले. त्यांच्यासमवेत कोकण आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड उपस्थित होत्या.
खेड तालुक्यातील पोसरे येथील दरडग्रस्त भागाची पाहणी करून चिपळूणकडे येताना वाटेत दळवटणे येथे शेतीची पाहणी करत हे पथक सायंकाळी 4 वाजता वाशिष्ठी नदीवरील पुलावर पोहोचले. महापुरात तेथील वाहून गेलेला भराव, पाण्याची तीव्रता या बाबतची माहिती महामार्गाचे उपविभागीय अभियंता रॉजर मराठे, प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडून घेतली. त्यानंतर शहरातील शंकरवाडी येथील सतीश घाडगे यांच्या कोसळलेल्या घराची पाहणी केली. चिपळूण मंडल अधिकारी उमेश गुज्जेवार तसेच घाडगे यांनी तेथील वस्तूस्थिती कथन केली. यावेळी तेथील घरांच्या भिंतीवर उमटलेल्या पुराच्या पाण्याच्या रेषेचे छायाचित्र या पथकाने घेत घाडगे यांना घरातील माणसे, सध्या कोठे राहता, मदत कशी मिळाली, या बाबतची माहिती घेतली. यानंतर डीबीजे महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाने केंद्रीय पथकाला महापूर, दरड दुर्घटना आणि मदत या बाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यनंतर हे पथक कराडकडे रवाना होताना वाटेत खेर्डीची पाहणी केली.
अहवाल सरकारला सादर करणार
दरम्यान, महापुरानंतरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राची दोन पथके पुणे आणि कोकण विभागात सोमवारपासून दाखल झाली आहेत. एक पथक सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये तर आम्ही आज रत्नागिरी जिल्हय़ात आलो आहोत. 22 जुलैच्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. आम्ही पाहणी करत संपूर्ण माहिती घेत असून नुकसानीचा अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे या पथकातील अभय कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
दौऱयात पेढे, एन्रॉन पूल वगळले! मुळातच हे केंद्रीय पथक चिपळुणात दरडग्रस्त पेढे गावाला भेट देऊन महापुरात खचलेल्या एन्रॉन पुलाचीही पाहणी करणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मंगळवारी अवघ्या तास-दीड तासांतच पथकाने दौरा गुंडाळला. यामध्ये पूर्वनियोजित पेढे आणि एन्रॉन पूल पाहणी झालीच नाही. विशेष म्हणजे या दौऱयाबाबत लोकप्रतिनिधींसह अन्य कुणालाही माहिती न देता गुप्तता पाळण्यात आली. त्यामुळे ना कुणाची भेट ना चर्चा झाली.