कोरोना व्यवस्थापन तज्ञ समितीची शिफारस
प्रतिनिधी /पणजी
कोरोना व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीने गणेश चतुर्थीकरीता कडक नियमावली लागू करावी तसेच केरळमधून गोव्यात येणाऱया प्रवाशांना, पर्यटकांना दोन्ही डोस घेतलेले असले तरी आरटीपीसीआर चाचणीचे बंधन घालावे, तसेच त्यांना काही दिवस विलगीकरणात ठेवावे अशा शिफारशी सरकारला केल्या आहेत.
सरकारने या शिफारसींबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. तज्ञ समितीच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या समितीत बहुतेक सर्व डॉक्टर्सचा समावेश आहे.
केरळमधून येणाऱयांना ‘होम क्वारंटाईन’ करावे
केरळ राज्यात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून तो गोव्यात पोहोचू नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे. एक तर त्यांना कोविड सेंटरमध्ये किंवा घरी क्वारंटाईनमध्ये ठेवावे. तो कालावधी किमान 5 दिवसांचा असावा किंवा सरकारने ठरवावा, असे तज्ञ समितीचे म्हणणे आहे.
कर्नाटकप्रमाणे कडक एसओपीची आवश्यकता
कर्नाटक सरकारने याबाबतीत कडक एसओपी लागू केली असून त्याच धर्तीवर गोवा राज्याने देखील केरळहून येणाऱयांसाठी एसओपी लावावी असे समितीने सरकारला सूचवले आहे. दि. 1 सप्टेंबरपासून कर्नाटक सरकारने त्या एसओपीची कार्यवाही सुरु केली असून गोव्यात तशा प्रकारे कोणतीच एसओपी नसल्यामुळे कोरोनाचा धोका संभवतो अशा इशाराही तज्ञ समितीने सरकारला दिला आहे. त्याची दखल अद्याप सरकारने घेतलेली नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांना देखील कर्नाटक सरकारने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे, अशी माहिती तज्ञ समितीच्या एका डॉक्टरने दिली.
तिसरी लाट रोखण्यासाठी कार्यवाही महत्वाची
सरकारने समितीच्या शिफारशी त्वरित मान्य कराव्यात आणि त्यांची कार्यवाही तातडीने चालू करावी, असेही समितीने म्हटले आहे. गोव्यातील कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काहीतरी कार्यवाही आवश्यक आहे, असेही समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
गणेश चतुर्थी साजरी करताना काळजी घ्यावी
गणेश चतुर्थी काळात घरोघरी, बाजारात व इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होणार असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो असे स्पष्ट केले आहे. म्हणून चतुर्थीत सर्वांनी काळजी घेण्याची गरज असून गर्दी टाळून मर्यादित स्वरुपात आपापल्या घरी चतुर्थी करावी. आरतीसाठी एकमेकांकडे जाऊ नये, तसेच मूर्ती विसर्जनाच्या वेळी वेळेची मर्यादा आखून घ्यावी. जेणेकरुन गर्दी होणार नाही हे पहावे अशा सूचना समितीने केल्या आहेत. घुमट आरती स्पर्धा नको असेही त्यांनी म्हटले आहे. पॉझिटिव्हीटी दर जर 5 टक्के पेक्षा कमी असेल तर कॅसिनो 50 टक्के उपस्थितीने सुरु करण्यास हरकत नाही, असेही समितीने म्हटले आहे.