लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधींचा घणाघात : शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीकास्त्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. राहुल यांनी स्वतःच्या भाषणात तिन्ही कृषी कायद्यांचे कंटेंट (तरतुदी) आणि इंटेंट (हेतू) वरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नव्या कायद्यांचा उद्देश मोठय़ा उद्योगपतींना कृषी उत्पादनांचा अमर्यादित साठा, अमर्यादित खरेदी करू देणे आणि योग्य दर न मिळाल्यावर शेतकऱयांना न्यायालयात जाण्यापासून रोखणे आहे. हे कायदे लागू झाल्यावर या देशातील शेतकरी, मजूर, छोटे व्यापाऱयांचा धंदा बंद होणार आहे. शेतकऱयांना योग्य भाव मिळणार आहे. केवळ 4 जण ‘हम दो और हमारे दो’ या देशाला चालवतील. अन्नसुरक्षा व्यवस्था नष्ट होईल, हिंदुस्थानच्या लोकांना उपाशी मरावे लागेल. ग्रामीण अर्थव्यवस्था नष्ट होईल आणि देश रोजगार निर्मिती करू शकणार नाही. नव्या कायद्यांमुळे भूक, बेरोजगारी आणि आत्महत्येचाच पर्याय उरणार असल्याचा दावा राहुल यांनी लोकसभेत बोलताना केला आहे.
पंतप्रधान मोदींनी बुधवारी स्वतःच्या भाषणात विरोधक कृषी कायद्यातील कंटेंट अणि इंटेंटविषयी बोलत नसल्याचे म्हटले होते. मी त्यावर बोलणार असल्याने म्हणून पंतप्रधानांनी आनंदी व्हायला हवे. पहिल्या कायद्यानुसार कुठलाही व्यक्ती कुठेही, कितीही धान्य, फळभाज्या खरेदी करू शकतो. जर खरेदी देशात अमर्यादित झाल्यास बाजार समित्यांमध्ये कोण जाणार, पहिल्या कायद्याचे लक्ष्य देशातून बाजार समित्या संपविण्याचा युक्तिवाद राहुल यांनी केला आहे.
दुसऱया कायद्यानुसार मोठय़ातला मोठा उद्योगपती कितीही धान्य, फळे, भाज्यांचा साठा करू शकतो. त्यांना हवी तितकी साठेबाजी करता येणार आहे. या दुसऱया कृषी कायद्याचा हेतू अत्यावश्यक वस्तू कायदा संपविण्याचा आणि अमर्यादित साठेबाजी सुरू करण्याचा आहे. तिसऱया कायद्यात कुठल्याही शेतकऱयाला स्वतःच्या पिकाच्या योग्य भावाकरता न्यायालयात जाऊ न देण्याचा कंटेंट असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
हम दो, हमारे दो
कित्येक वर्षांपूर्वी हम दो, हमारे दो असा नारा देण्यात आला होता. आता इंटेंटवर बोलेन. कोरोना जसा दुसऱया स्वरुपात येतो, तसाच हा नारा आता वेगळय़ा स्वरुपात येतो. आज या देशाला चारच लोक चालवितात, हम दो और हमारे दो. या दोन मित्रांपैकी सर्वात मोठय़ा मित्राला पूर्ण हिंदुस्थानात फळे, धान्य आणि भाज्या विकण्याचा अधिकार मिळणार आहे. तर नुकसान छोटय़ा व्यापाऱयांचे आणि बाजारांमध्ये काम करणाऱयांचे होणार आहे. दुसऱया कायद्याचा इंटेंट (हेतू) दुसऱया मित्राची मदत करण्याचा आहे. दुसऱया मित्राला देशभरात फळे, भाज्या, धान्याचा साठा करण्याची मक्तेदारी द्यायची असल्याचे काँग्रेस खासदाराने म्हटले आहे.
राहुल यांच्या कृतीमुळे वाद
राहुल गांधी यांनी स्वतःच्या भाषणाच्या अखेरीस शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान जीव गमाविणाऱयांच्या सन्मानार्थ 2 मिनिटांचे मौन राखण्याची घोषणा केली. 200 शेतकरी हुतात्मा झाले, त्यांना सत्तारुढ पक्षाने श्रद्धांजली वाहिली नाही. मी 2 मिनिटे हुतात्म्यांसाठी मौन राखणार असून तुम्हीही माझ्यासोबत उभे रहा असे राहुल यांनी म्हटल्यावर काँग्रेसचे अन्य खासदारही उभे राहिले. तर सभापती ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली तर सत्तारुढ खासदारांनी ‘शेम, शेम’ अशा घोषणा दिल्या आहेत. कुठल्याही सदस्याने अशाप्रकारे श्रद्धांजली देणे योग्य नाही तसेच सभागृहाच्या प्रतिष्ठेला धरून नसल्याचे सभापतींनी राहुल गांधी यांना सुनावले आहे.
अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा सुरू
मोदी सरकारने अलिकडेच संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर गुरुवारपासून संसदेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पहिल्याच दिवशी काँग्रेससह विविध नेत्यांनी मतप्रदर्शन केले. देशाचा अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक असल्याची टिप्पणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. तसेच हा अर्थसंकल्प म्हणजे श्रीमंतांनी, श्रीमंतांना आणि श्रीमंतांसाठी केलेली आर्थिक तरतूद असल्याचा दावाही त्यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांसाठी या अर्थसंकल्पात मोठय़ा तरतुदी करण्यात आल्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.