महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे कैवारी असलेले नेते एन. डी. पाटील यांनी वयाच्या 93व्या वषी कोल्हापूर येथे अखेरचा श्वास घेतला. सर्वसामान्यांची, शेतकरी, कष्टकरी, सीमा भागातील मराठी जनतेची लढाई पोरकी करुन ते गेले आहेत. सत्तेच्या साठमारीत रमलेल्या नेत्यांना वास्तवाचे भान देत झुंजणारा आवाज शांत झाला. कापूस एकाधिकार, रोजगार हमी या योजना शेकापक्षाच्या दबावामुळेच राबवल्या गेल्या. दुष्काळ, वीज कपात, शेतकऱयांचे प्रश्न यावरील सभागृहातली घणाघाती भाषणे असोत किंवा विविध विषयांवरील अभ्यास पुस्तिका असोत लोकशाहीची सर्व आयुधे वापरून या प्राध्यापकाने सत्तेला जेरीस आणले. ‘तुमच्यात खूप टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटची गरज सत्तापक्षाला आहे’ अशा गोड शब्दात आलेली ऑफर एन. डी. पाटील यांनी ‘माझे टॅलेंट माझ्याजवळ राहू द्या, तुमच्या पक्षाची गरज तुमच्या जवळच ठेवा’ अशा स्पष्ट शब्दात धुडकावून लावली. कोकण पट्टय़ात त्यांनी केलेल्या कामामुळे शेकापक्ष आजही अस्तित्व राखून आहे. पश्चिम महाराष्ट्रात झटणाऱया युवकांची पिढी घडवली मात्र राजकारण भक्कम करण्यात त्यांना यश मिळाले नाही. तरीही जनतेचा कोणताही प्रश्न असला तरी गोविंदराव पानसरे, एन. डी. पाटील, यांच्या सहभागाशिवाय तो यशस्वी होणार नाही हा जनतेचा त्यांच्यावर कायम विश्वास राहिला. बहुमताच्या राजकारणाविरोधात जनमताचे राजकारण करणे आणि कायदे मंडळात हरणारी लढाई रस्त्यावर जिंकण्यात त्यांचा हातखंडा होता. त्याची अगदी अलीकडच्या पाव शतकातील सर्वात मोठी उदाहरणे म्हणजे शेतीपंपाची 333 टक्के वीज दरवाढ मागे घ्यायला लावणे, महाकाय एन्रॉन प्रकल्पाचे विसर्जन, रायगड जिह्यात सेझद्वारे हजारो एकर शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न उधळून लावणे, आंदोलनाची धार वाढवून राज्यकर्त्यांना टोल मुक्त कोल्हापूरचा निर्णय घ्यायला लावणे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी रस्त्यावर उतरणे किंवा राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे खाजगीकरण रोखण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारवर नैतिक दबाव निर्माण करणे हे कार्य केवळ आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच ते करू शकले. सुरुवातीच्या काळात इस्लामपूर येथे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकऱयांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष गोळीबार केला होता. त्यांच्या पुतण्यासह 5 कार्यकर्त्यांची शाळकरी मुले पोलीस गोळीबारात मारली तरी त्यानंतरही न डगमगता, दुःख मागे सारुन त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मृत्यूपूर्वी पाटील यांचा हात हातात घेऊन रयत शिक्षण संस्थेसाठी सदैव कार्यरत राहण्याचे वचन घेतले होते. त्या वचनाला ते आयुष्यभर जागले. रयतचे काम करताना त्यांनी आयुष्यभर कोणतेही मानधन घेतले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी रयतमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रम शाळा, साखर शाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील आयटी इन्स्टिटय़ूट, कमवा आणि शिका योजनेला चालना, स्पर्धा परीक्षा केंदे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, दुर्बल शाखा विकास योजना, विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन असे प्रयोग राबवून आपल्या दूरदृष्टीचा लाभ संस्थेला आणि ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी, सर्वसामान्यांच्या लाखो मुला-मुलींना मिळवून दिला. सीमाभागात ही त्यांनी हे कार्य करून दाखवले. शिक्षण सेवकांचा प्रश्न, वेतनेतर अनुदानाचा प्रश्न सोडवण्याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरण राबविताना त्यांची प्रखर भूमिका महाराष्ट्राने पाहिली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड या आपल्या जुन्या सहकाऱयांच्या मदतीने आयुष्यभर धरणग्रस्त, दुष्काळी शेतकऱयांचे पाण्यासंबंधी आंदोलन आणि सुकाळी भागातील शेतकऱयांच्या पाणी वापर संस्थांच्या हिताचे आंदोलन ते करत राहिले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे राजस्थानचे राज्यपाल असताना त्यांनी शेतकरी संघटना स्थापन केली. प्रसंगी आघाडीचे राजकारण करायचा मार्ग त्यांनी दाखवला. शरद पवारांशी नातेसंबंध असतानाही प्रसंगी अनेकदा त्यांच्या विरोधात आंदोलन उभे करणे त्यांनी थांबवले नाही. रयत संस्थेच्या हितासाठी ते प्रदीर्घ काळ एकत्र राहिले पण राजकीय विरोध कायम होता. 99 साली युती शासन घालवण्यासाठी लोकशाही आघाडी स्थापन करण्याचे कामही त्यांनीच केले आणि शेतकरी प्रश्नावर दोन्ही काँग्रेसचे निर्णय बदलायला भाग पाडले. त्यामुळेच प्रश्न अनेक, उत्तर फक्त एक- एन. डी. पाटील अशी त्यांची ओळख निर्माण झाली. सहकार मंत्री म्हणून त्यांची छोटीच मात्र महत्त्वपूर्ण अशी कारकीर्द घडली. सहकारी संस्थेत एका व्यक्तीने पूर्ण पॅनेलला मतदान करणे हा लोकशाहीला घातक प्रकार असल्याचे त्यांचे मत होते म्हणूनच ‘एक व्यक्ती एक मत’ असा कायदा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र प्रस्थापितांनी तो मंजूर होऊ दिला नाही. उत्तरायुष्यात काठी घेऊन प्रसंगी वॉकर घेऊन आणि अंतिम काळात तर व्हीलचेअरवर बसूनही ते शेतकऱयांच्या आंदोलनात सामील झाले. अलीकडच्या काही दिवसात त्यांना स्मृतिभ्रंश झाला. तेव्हा सुद्धा भेटीला आलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहिल्यानंतर ते मोर्चा केव्हा आहे आणि कोणत्या प्रश्नाचे आंदोलन आहे? असेच विचारायचे. अंथरुणाला खीळलेल्या अवस्थेतही या भीष्माचार्यांनी आपल्या वाचन आणि अभ्यासाची धार कमी केली नव्हती. त्या अभ्यासाने आणि आत्मविश्वासाने त्यांना आयुष्यभर आंदोलनात यश दिले. त्यांच्या मार्मिक भाषणांचे किस्से आजही सांगितले जातात. शेतकऱयांच्या प्रश्नावर सत्ताधारी मुग गिळून गप्प आहेत म्हणून मुगाचे भाव वाढले आहेत अशी बोचरी टीका करून ते लोकांना सरकारविरोधी जागृत करायचे. असे नेते ही महाराष्ट्राला मिळालेली मोठी देणगी होती. सामान्यांचा कैवारी आज आपण गमावला आहे. त्यांना तरुण भारत परिवारातर्फे विनम्र अभिवादन!
Previous Articleप्राण आणि अपान यांच्यातील साम्यावस्था
Next Article सेरेना टॉप 50 मधून बाहेर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.