कोरोनाच्या लढाईमध्ये कोकण पहिल्यापासून अग्रेसर राहिले. मात्र आता वर्षभरानंतर कोरोनाची परिस्थिती बदलल्याने कोकणातही कोरोनाच्या दुसऱया लाटेने उसळी घेतली आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये राज्यात अग्रेसर असणाऱया कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातही कोरोनाच्या दुसऱया लाटेने उसळी घेतली आहे. रुग्ण संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कोकणात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शंभर टक्के लसीकरणाचा रामबाण उपाय असला, तरी दिवस-रात्र न थकता काम करणाऱया प्रशासनाला नियमांचे पालन करून सहकार्याची भूमिका प्रत्येक नागरिकाने ठेवायला हवी.
मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांनी अतिशय मेहनत होऊन कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले. फक्त ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने वाढले होते आणि मृत्यूही वाढले होते. याचे कारणही तसेच होते ते म्हणजे गणेशोत्सवाचा तो काळ होता. त्यावेळी गणेशोत्सवासाठी जिल्हय़ाबाहेरून दोन लाखापेक्षा जास्त नागरिक कोकणात दाखल झाले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढून त्या तीन महिन्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि जनतेने नियमांचे पालन करण्यासाठी घेतलेल्या चांगल्या भूमिकेमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवता आले. त्यामुळे कोरोनाच्या लढाईमध्ये कोकण पहिल्यापासून अग्रेसर राहिले. मात्र आता वर्षभरानंतर कोरोनाची परिस्थिती बदलल्याने कोकणातही कोरोनाच्या दुसऱया लाटेने उसळी घेतली आहे.
रत्नागिरी जिल्हय़ाची स्थिती पाहिली, तर आतापर्यंत 19,616 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 13,616 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 594 रुग्णांना कोरोनाने जीव गमवावा लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात आतापर्यंत 11,623 रुग्ण आढळले असून 8,443 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 281 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दोन्ही जिल्हय़ांची स्थिती पाहिली, तर मार्च महिन्यापर्यंत कोरोनावर चांगलेच नियंत्रण राहिले. मात्र एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच कोरोनाच्या दुसऱया लाटेने उसळी घेतली आहे. खरंतर कोरोनाची दुसरी लाट राज्यातील इतर जिल्हय़ात आली, तेव्हा कोकणात आली नव्हती. मात्र ज्यावेळी लाट आली, त्यावेळपासून रुग्णवाढीला बेक लागलेला नाही. रत्नागिरी जिल्हय़ात दररोज 500 च्या पटीत रुग्ण आढळत आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 300 च्या पटीत रुग्ण आढळत आहेत. मृत्यू संख्याही दररोज 10 ते 15 च्या पटीत वाढत आहे. यावरून दोन्ही जिल्हय़ात कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे, हे स्पष्ट होत आहे. बाजारपेठांमधील गर्दी अजूनही कमी झालेली नाही. मास्क न वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करूनही काही लोक मास्क वापरण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा अनेक कारणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पहिल्या लाटेवेळी कोरोनाबाधित होम क्वारंटाईनमध्ये राहिले तरी कुणाच्या संपर्कात येत नव्हते. मात्र आताची परिस्थिती थोडी बदलती आहे. लोक अगदी निर्धास्त झाले आहेत. काटेकोर नियमांचे पालन होताना दिसत नाहीत.
जिल्हय़ाबाहेरून येणारे नागरिक 14 दिवस क्वारंटाईन राहत नाहीत. त्यामुळे जिल्हय़ाबाहेरून येणारी व्यक्ती कुटुंबात आणि गावात बिनधास्त फिरताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे पूर्वी फक्त शहरामध्ये कोरोना रुग्ण आढळत होते, ते आता ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. कोरोनाचा विस्फोट झाल्यानंतर शासनाने 14 दिवस क्वारंटाईनचा नियम पुन्हा लागू केला. परंतु, त्याचीही कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा प्रशासनाने ग्राम नियंत्रण समित्या कार्यान्वित करण्याचे आदेश काढले. मात्र पूर्वीप्रमाणे या समित्या ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत नाही.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात कोरोनाची दुसरी लाट उसळली असल्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्ण वाढ रोखण्याबरोबरच मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्याचे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी दोन्ही जिल्हय़ांची सर्व आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा न थकता दिवस-रात्र काम करीत आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा कोरोना नियंत्रणासाठी फार मेहनत घेत आहेत. त्यांना गरज आहे ती आता लोकप्रतिनिधी आणि प्रत्येक नागरिकाने सहकार्य करण्याची.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी कोरोना नियंत्रणासाठी मैदानात उतरल्या आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतः जाऊन कोविड केअर सेंटर सुरू करीत आहेत. जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावरही भेटी देत आहेत. आरोग्य यंत्रणा कशी कार्यरत आहे, हे पाहून प्रोत्साहनही देत आहेत. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाचे गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार केले जातात का? ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटीलेटरची गरज असणाऱयांना व्हेंटीलेटरवर उपचार मिळतात की नाही, याचा रोजच्या रोज आढावा घेत आहेत. किंबहुना प्रत्यक्षपणे कोविड वॉर्डला वारंवार भेटीही देत आहेत. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आहे का, कोरोनामुक्त रुग्णांना घरी जाण्याची व्यवस्था आहे का याचीही पुरेपूर काळजी घेतली जात आहे, अशा पद्धतीने रत्नागिरीचे जिल्हाधिकारीही मैदानात उतरून काम करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱयांना सहकार्याची भूमिका प्रत्येक नागरिकाने ठेवल्यास हाताबाहेर जाणारी परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.
कोरोनावरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा रामबाण उपाय आहे. परंतु, लसीचा पुरवठा मोठय़ा प्रमाणात अजूनही होत नाही. लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. परंतु, पुरवठाच कमी असल्याने प्रशासनालाही लसीकरण सुरक्षित ठेवण्यात अडचणी येत आहेत. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यास सुरुवात होणार आहे. त्यावेळी लसीचा पुरवठा कमी झाला, तर आणखी अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे जनतेने गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवायला हवी.
हाताबाहेर जाणाऱया कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरणाचा रामबाण उपाय असला, तरी मास्क वापरणे हे मोठे शस्त्र आहे. या शस्त्राचा प्रत्येकाने वापर केला आणि नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्याची भूमिका ठेवल्यास कोकणातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊन पुन्हा एकदा राज्यात कोकण अगेसर राहील. राजकारणी मंडळींनीही आणीबाणीच्या स्थितीमध्ये राजकारण करीत न बसता प्रशासनाला सहकार्य करायला हवे.
संदीप गावडे