ऑनलाईन टीम / मुंबई :
काही वर्षांपासून कोकण किनारपट्टीवरील वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. आताही मार्च महिन्यात कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे 21 मार्चला आसानी चक्रीवादळात रुपांतर होऊन मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे वादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकून बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीपर्यंत पोहचू शकते. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्याकडुन सर्व मच्छीमार बांधवांना हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता
असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस केरळसह तामिळनाडू, पुद्ददुचेरी कराईकल आणि दक्षिण कर्नाटकातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.