आज 15 मार्चपासून प्रारंभ तर 4 एप्रिला अखेरचा पेपर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचे जाहीर केल्यानंतर शाळास्तरावर परीक्षांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यावेळेस कोकण बोर्डातून दहावीसाठी 31 हजार 526 विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ ही संकल्पना यावेळेस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राबवण्यात आली आहे.
एका शाळेत 15 पेक्षा जास्त परीक्षार्थी असतील तिथे परीक्षा केंद्र करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा द्यायची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ देण्यात आलेला आहे. पेपर सुरू होण्याआधी दहा मिनिटे अगोदरच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
कोकण बोर्डातून एकूण 31 हजार 526 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात 21 हजार 79 तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 10 हजार 447 इतके विद्यार्थी आहेत. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेले आहे.