प्रतिनिधी/ खेड
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मध्य, पश्चिम व दक्षिण मध्य रेल्वेने आणखी 10 गणपती स्पेशलच्या फेऱया जाहीर करत चाकरमान्यांना दिलासा दिलेला असतानाच कोकण मार्गावरून धावणाऱया 6 गणपती स्पेशल गाडय़ांना मुदतवाढ देण्याचा निर्णयही रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पनवेल-चिपळूण, पनवेल-सावंतवाडी स्पेशलसह अन्य 6 स्पेशल गाडय़ांचा समावेश आहे. या स्पेशलना मुदतवाढ देण्यात आल्याने चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत.
गणेशोत्सवासाठी मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाने तब्बल 224 फेऱया जाहीर करत गणेशभक्तांना सुखद धक्का दिला आहे. पश्चिम रेल्वेही गणेशभक्तांच्या दिमतीला धावल्याने विरार, वसई, बोरिवली स्थित चाकरमान्यांना गाव गाठणे सुकर झाले आहे. दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. 5 दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनानंतरही कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांना गर्दी उसळणार आहे.
कोकण मार्गावरून धावणाऱया सर्व गणपती स्पेशल आरक्षित आहेत. गावाहून मुंबईला परतणाऱया चाकरमान्यांमुळे गणपती स्पेशलना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 6 गणपती स्पेशल गाडय़ांना मुदतवाढ दिली आहे. चिपळूण-पनवेल स्पेशल 15 सप्टेंबरपर्यंत धावणार होती. ही स्पेशल आता 20 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. पनवेल-सावंतवाडी स्पेशल 15 सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार होती. ही स्पेशल 17 सप्टेंबरपर्यंत कोकण मार्गावर धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी स्पेशल 14 सप्टेंबरपर्यंत धावणार होती. या स्पेशललाही आणखी 2 दिवस मुदतवाढ देण्यात आली असून ही स्पेशल 16 सप्टेंबपर्यंत धावेल. या स्पेशल गाडय़ांतून प्रवास करताना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.