मनपाकडून कार्यवाहीच नसल्याने नाराजी : भंगीबोळात कचऱयाचे साम्राज्य
प्रतिनिधी / बेळगाव
कोतवाल गल्ली परिसरात भाजीविक्री केली जाते. त्यामुळे भू-भाडय़ाच्या माध्यमातून महापालिकेला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. पण इतका महसूल मिळूनही स्वच्छतेचे काम होत नाही. वॉर्ड क्र. 34 मध्ये येणाऱया गल्लीतील बोळात भाजीविक्रेते कचरा टाकत आहेत. याबाबत कोतवाल गल्लीतील रहिवासी 20 वर्षांपासून मनपाकडे तक्रार करीत आहेत. मात्र, याबाबत ठोस कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वृद्ध व्यक्तीला आणखी किती वर्षे लढाई द्यावी लागणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
येथील समस्येबाबत कोणती कार्यवाही केली, याची विचारणा महापालिकेकडे माहिती हक्क अधिकार कायद्यांतर्गत केली असता, याचे समर्पक उत्तर देण्यात आले नाही. यामुळे जिल्हाधिकारी व नगरविकास खात्याला पत्र पाठवून महापालिका अधिकाऱयांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती विजय भोज यांनी दिली.
एकीकडे शहर स्मार्ट करण्याच्यादृष्टीने प्रशासन आटापिटा करीत आहे. पण दुसरीकडे स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बाजारपेठेतील कचऱयाची उचल करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने कंत्राटदारावर सोपविली आहे. पण गटारी स्वच्छ करण्याकडे कंत्राटदाराच्या कामगारांनी टाळाटाळ चालविली आहे. कोतवाल गल्ली परिसरात भाजी मंडई असल्याने परिसरातील कचऱयाची उचल आणि गटारींची स्वच्छता नियमितपणे करण्याची गरज आहे. खडेबाजार व कोतवाल गल्लीच्या मध्ये असलेल्या भंगीबोळात कचरा टाकण्यात येत असल्याने भंगीबोळाला कचरा डेपोचे स्वरुप आले आहे. यामुळे भंगीबोळात कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. अशातच या ठिकाणी हातगाडय़ा लावण्यात येत आहेत. भंगीबोळात कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
समस्यांचे निवारण करण्यास मनपा अपयशी
कोतवाल गल्लीतील भाजीविक्रेते भंगीबोळात कचरा टाकत आहेत. काही नागरिक मलमूत्र करून घाण करीत असल्याबाबतची तक्रार महापालिकेकडे केली होती. याबाबत महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. भू-भाडय़ाच्या माध्यमातून मनपाला लाखोंचा निधी मिळतो. पण समस्यांचे निवारण करण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. गेल्या वीस वर्षांपासून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. वीस वर्षांत भू-भाडय़ाच्या माध्यमातून मनपाला कोटीचा महसूल मिळाला आहे. पण येथील समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे समस्येचे निवारण करण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
परिसरातील पथदीप बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही याची दखल घेण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी मनपाकडे विजय भोज यांनी केली. समस्येचे निवारण करण्यासाठी विजय भोज या वृद्ध व्यक्तीने मागील वीस वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. पण कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे वृद्ध व्यक्तीला आणखी किती वर्षे पाठपुरावा करावा लागणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.