राष्ट्रीय आपत्तीत होते कार्यरत
जत / प्रतिनिधी
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आपत्तीत कार्यरत असणारे जत तालुक्यातील डफळापुर चे शिक्षक नानासाहेब कोरे याना ट्रक चालकाने मंगळवारी पहाटे चिरडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना जितकी वेदनादायी, संतापजनक आहे, तितके तिने अनेक प्रश्नही अधोरेखित केले आहेत. मुळात या घटनेने संगलीसह राज्यभरातील शिक्षकांचे मन सुन्न झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती असो अथवा कोणतेही काम असो नेहमीच अग्रस्थानी असणाऱ्या गुरुदेव शिक्षकांना समाजाने कायमच सलाम केला आहे. पण कोरे गुरुजींसारख्या एखाद्या उपक्रमशील आणि देशप्रेमाने भारावलेल्या शिक्षकाच्या नशिबी असा प्रसंग येणे हे क्लेशदायक आणि चिंतनशील आहे.
सबंध देशभरात कोरोनो व्हायरसने थैमान घातले आहे. या आजाराला रोखताना देशातील बांधवांची वज्रमूठ एकजुटीने लढते आहे. प्रशासनातील सर्वच विभागाचे काम नक्कीच प्रेरणादायी आहे. असे असले तरी एखादी घटना अशी काही चटका लावून जाते की यात दोष द्यायचा तरी कुणाला आणि मग आपली व्यवस्था कशा पद्धतीने कार्यरत असते यासह विविध प्रश्नांना ती छेडत राहते.
डफळापूरच्या नानासाहेब कोरेंच्या बाबतीत जे घडले त्या घटनेने अनेक प्रश्न समोर येतात . खरेतर आज कोरे गुरुजींचे बलिदान तमाम शिक्षक वर्ग व समाजमन कधीच विसरणार नाही. परंतु राज्यात आणि देशातील शिक्षक हा एक असा घटक आहे. जो गुरुस्थानी राहून कार्य करत असतानाही त्यांना अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटनाना सातत्याने तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
सन 2007 साली कोरे गुरुजी अतिशय हिमतीने शिक्षकी पेशात कार्यरत झाले. तीन वर्षापूर्वी रत्नागिरी येथून ते आपल्या मूळ जत तालुक्यात रुझु झाले होते. मूळ पिंडच समाज हिताचा होता. शाळेच्या उपक्रमशील कामाव्यतिरिक्त समाजकार्य करणारे ते तरुण शिक्षक ! सोमवारी दिवसभर ते आपल्या शाळेत ऑनलाइन शिक्षणप्रणालीचे मार्गदर्शन करत होते. रात्री चेकपोस्ट वर ड्युटी असल्याने ते शिंगणापूर चेक पोस्टवर राष्ट्रीय कर्तव्यासाठी हजर ही झाले. रात्रभर येनाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदी, तपासणी करत असताना त्यांचा एका विचित्र घटनेत दुर्दैवी अंत झाला.
वास्तविक कोरे गुरुजीं सारखीच राज्यातील अनेक शिक्षकांची अवस्था काही वेगळी नाही. मुळात चेकपोस्ट वरचे कसलेही प्रशिक्षण नसताना त्यांच्या नियुक्त्या केल्या, शिवाय त्यांना कसलेही संरक्षण तथा त्याबाबतची नियमावली नाही. त्यातच राज्य सरकारच्या धोरणा प्रमाणे 2005 नंतर नोकरीत लागलेल्या कुठल्याही नोकरदाराला ना पेन्शन , ना फंडाच्या बाबतीत स्पष्ट धोरण. या लोकांच्या कुटुंबात अशी अघटित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबातील वारसांना नोकरीची हमी नाही. 2005 नंतर अशा संकटांना तोंड दिलेल्या एकाही कुटुंबाला पुढे मोठा आधार राज्य सरकारकडून मिळाल्याची वार्ता कुठं ऐकिवात नाही. याचाही विचार गांभीर्याने होणे गरजेचे आहे.
आंतरराज्य सीमा इतक्या ढिल्या का?
या घटनेतून आणखीन एक महत्त्वपूर्ण बाब समोर येते, ती म्हणजे राज्य सीमा तथा तेथील ते चेकपोस्ट इतके ढिले का आहेत ? राष्ट्रीय आपत्तीचा मुकाबला करताना किमान आंतरराज्य सीमा खूपच संवेदनशील असायला हव्यात, शिंगणापूर येथील चेक पोस्ट विचारात घेता येथे एक पोलीस, एक स्वयं सेवक आणि एक शिक्षक असे तिघे होते, वास्तविक मुळ हीच बाब गंभीर आहे , रात्री पोलीस होते का या प्रश्नापेक्षा अंतर राज्य सीमा कडक असायला हवी होती , तसेच आज विज्ञानाने जग एक केले आहे, मग तेथे वॉकी-टॉकी , वायरलेस यंत्रणा, सक्षम अधिकारी , टीमवर्क असायला हवे होते. एखादा कोरे गुरुजींसारखा शिक्षक जीव धोक्यात घालून काम करत असताना या गोष्टीचा विचार जरूर व्हायला हवा होता, पण या घटनेत असे काही दिसत नाही.
एकूणच ही घटना यंत्रणेसह अनेक गोष्टींकडे बोट वळवणारी आहे. पण यात गुरुजींचा जीव गेला हे खूपच चटका लावणारे आहे, आता किमान त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये इतकेच !