महामारीच्या त्सुनामीने ग्रस्त झालेला सामान्य माणूस आता पंतप्रधानांनाच प्रश्न विचारू लागला आहे. ही साथ वेळीच आटोक्मयात आणली नाही तर किडा-मुंगीप्रमाणे माणसे मरतील असे इशारे तंतोतंत खरे होताना दिसत आहेत.
कोरोनाच्या आलेल्या दुसऱया महाभयंकर लाटेने नरेंद्र मोदी सरकारच्या तोंडचे पाणी पळवले आहे. काल परवापर्यंत मोदींच्या नेतृत्वामुळे या भयानक महामारीपासून देश वाचला असा दावा करणारे भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा अचानक शांत झाले आहेत तर या महामारीने उडालेल्या हाहाकाराने विरोधी पक्षांच्या हातात आयतेच कोलीत दिले आहे. पंतप्रधानांना निवडणुकांमधील प्रचाराला वेळ आहे पण या महामारीचा बंदोबस्त कसा करायचा हे ठरवण्यासाठी नाही अशा टीकेचा भडिमार सुरू असताना पंतप्रधान मोदींनी शनिवारी एक बैठक भरवली खरी. परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे चित्र गेले काही दिवस समोर येत आहे. कोरोनाचा फटका कशा रीतीने बसणार याविषयी केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रातदेखील खळबळ माजली आहे. आपली सारी शक्ती बंगाल जिंकण्यासाठी घालवलेल्या भाजपला तिथे विजय जरी मिळाला तरी तो क्षणभंगुर असणार अशी झपाटय़ाने स्थिती या महामारीमुळे बदलत आहे. विरोधी पक्षांनी साक्षात पंतप्रधानांनाच या परिस्थितीसाठी जबाबदार धरून सरकारची पंचाईत केली आहे. जोपर्यंत सगळे सुरळीत सुरू होते तेव्हा मोदींनीच सारे श्रेय लाटले होते असे विरोधकांचे म्हणणे आहे. नितीन गडकरी यांच्यासारख्या कार्यक्षम मंत्र्यांना कोरोना विरुद्धच्या कामात का सामील करून घेतले नाही असे प्रश्न विचारले जात आहेत. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन चांगले काम करत आहेत पण जर आभाळच फाटले तर एक माणूस कितपत उपयोगी पडणार. प्रभावी लसीकरणाची जबाबदारी एका मंत्र्याकडे तर रुग्णालय व्यवस्था दुसऱयाकडे तर समन्वयाचे काम अजून एखाद्याकडे दिले गेले असते तर सरकार चांगल्या प्रकारे काम करू शकले असते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. मोदी सरकारची एक खासियत ही आहे की आतापर्यंत झालेल्या सर्व सरकारात सध्याचे पंतप्रधान कार्यालय जास्त शक्तिशाली आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांनादेखील या सरकारात म्हणावे तसे महत्त्व नाही. घरीदारी जी स्थिती निर्माण झाली आहे त्याने भाजपमधील एक वर्गदेखील या महामारीबाबत सरकार गाफिल राहिले की काय अशा शंका विचारू लागला आहे. बरीचशी प्रसारमाध्यमे अजून सरकारी तालावरच नाचत असली तरी एकंदर परिस्थितीबाबत जनसामान्यात चर्चा सुरू झाली आहे हे मात्र खरे. साक्षात सरसंघचालकांना या महामारीचा फटका बसल्याने संघपरिवारातदेखील चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवडय़ात पंतप्रधानांनी ज्या तडकाफडकी बाहेरदेशीच्या इतर लसींना हिरवा कंदील दाखवण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ मोदी महामारीच्या या हाहाकाराने दडपून गेले आहेत असे मानले जात आहे. आपल्याकडे तयार झालेल्या लसी मोठय़ा प्रमाणावर जगात निर्यात करण्यात आल्या. कॅनडासारख्या देशात तर त्यामुळे मोदींचे आभार मानणारे फलकदेखील जागोजागी लावले गेले. शेतकरी आंदोलनात कॅनडाने मोदी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. ती मवाळ करण्यासाठी भारताने लस निर्यात केली असे बोलले जात आहे. अमेरिकेची लोकसंख्या आपल्या उत्तरप्रदेशएवढी. त्या देशाने जेवढय़ा लसी टोचल्या तेवढय़ाच त्याच्या पाच पटीने लोकसंख्या असूनही आपण टोचल्या आणि त्यामुळेच हे संकट गहिरे झाले आहे हे खरे आहे. आता तहान लागली असताना आपण विहीर खणायला लागलो आहोत.
पाच राज्यातील निवडणुकातील जोरदार प्रचार आणि हरिद्वार येथे कुंभमेळय़ाला दिलेली परवानगीदेखील ही महामारी वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. जर टी. एन. शेषन यांच्यासारखा कडक मुख्य निवडणूक आयुक्त असता तर साऱया पक्षांचीच पाचावर धारण बसली असती. सध्याची निवडणूक ही आयोग घेत नसून साक्षात गृह मंत्री अमित शहा घेत आहेत असा आरोप बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना करावासा वाटावा याचा अर्थ सारे काही आलबेल नाही असाच होतो. महामारीच्या त्सुनामीने ग्रस्त झालेला सामान्य माणूस आता पंतप्रधानांनाच प्रश्न विचारू लागला आहे. सरकारच्या फटफजितीची दुसरी पावती कोणती?
ही साथ वेळीच आटोक्मयात आणली नाही तर किडा-मुंगीप्रमाणे माणसे मरतील असे इशारे तंतोतंत खरे होताना दिसत आहेत. साऱया जगात महामारीचा जो प्रसार सुरू आहे त्यातील प्रत्येक चार नवीन रोग्यांमधील एक भारतीय आहे. उत्तरेतील काही शहरात मरणही महाग झाले आहे. ऑक्सिजन सिलेंडरची भयानक टंचाई जाणवत असताना महाराष्ट्राला केंद्र मदतच करत नाही असा आरोप सरकारमधील जबाबदार लोक करू लागले आहेत. केंद्राचा आक्रमकपणे बचाव करणारे माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकरदेखील या महामारीने त्रस्त झाले आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्रांसह अर्धा डझन मुख्यमंत्र्यांना या महामारीचा प्रसाद आतापर्यंत मिळाला आहे. बेळगावचे खासदार सुरेश अंगडींसारखे केंद्रीय मंत्री तर या साथीला बळी पडले आहेत. ‘अंधेर नगरी, चौपट राजा’ अशीच काहीशी ही स्थिती आहे.
सुनील गाताडे