7 टक्के विकासदर गाठणार : ‘आयएमएफ’चा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोविड-19 च्या संसर्गामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला आहे. भारतालाही त्याचा फटका बसला असून आर्थिक विकासदरात मोठी घट झालेली आहे. मात्र, या संकटातून भारत लवकरच सावरेल असा आशावाद ‘आयएमएफ’ने व्यक्त केला आहे. कोरोनाच्या संकटातून उभारी घेत भारत लवकरच 7 टक्केचे उद्दिष्ट गाठेल असे ‘आयएमएफ’चे भारतातील प्रतिनिधी रानिल साल्गादो यांनी म्हटले आहे.
1990 च्या दशकाच्या सुरूवातीपासूनचा काळ पाहिला तर भारताने आर्थिक विकासामध्ये सातत्य राखलेले आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षात भारतात हळूहळू संरचनात्मक सुधारणेची नोंद झालेली दिसते. त्यामुळे सध्याच्या कोलमडलेल्या आर्थिक स्थितीतूनही भारत सकारात्मक पद्धतीने मार्ग काढत कोरोनाचे संकट संपल्यानंतर पुन्हा मोठी उभारी घेईल, असे रानिल साल्गादो म्हणाले. सध्या सुरू असलेला कोविड-19 चा संसर्ग सर्वदूर पसरला आहे. या रोगाशी सामना करण्यासाठी आरोग्य सेवा आणि शास्त्रज्ञ प्रचंड मेहनत घेत आहेत. तसेच आर्थिक पातळीवरही विविध देश आपापली अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी धडपडत आहेत. भारतही यात मागे राहिलेला नाही. विशेषत: गरीब लोकांच्या जीवनावर झालेले नुकसान कमी करण्यासाठी भारताने वेगवेगळय़ा योजना जाहीर केलेल्या आहेत. याचाच फायदा भारताला भविष्यात होणार असल्याचेही साल्गादो यांनी सांगितले.