प्रतिनिधी / मडगाव
राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरलेले आहे. सरकारने आधीच लॉकडाऊन केले असते तर राज्याची ऐवढी बिकट परिस्थीती झाली नसती. कोरोनामुळे आज अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने राज्यातील जनतेला वाचवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. लोकांचा जीव गेल्यानंतर सरकारने ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे काम केले. ते तर आधीच केले असते तर अनेकांचा जीव वाचला असता. राज्यातील जनतेने लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. कोरोना पासून स्वताला वाचवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय बाकी राहिला असल्याचे दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील विविध ठिकाणी गतिरोधकावर रंग व सूचना फलक नसल्याने लोकांना गतिरोधक असल्याची माहिती नसते. त्यामूळे अनेक ठिकाणी अपघात सुद्धा घडलेले आहे. तेव्हा गतिरोधकावर पांढरा रंग व विविध ठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज आहे. कोंब-मडगाव येथे ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा यासाठी कोंकण रेल्वेशी संपर्क साधून सदर समस्या दूर केली जाईल. पावसाळय़ात या ठिकाणी पाणी भरत असल्याने याचा लोकांना त्रास सहन कारवा लागतो. त्यामुळे यावर खासदार निधीतून कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येणार असल्याचे खा. सार्दिन यांनी यावेळी सांगितले.