बागलकोटच्या युवकांचा पायी प्रवास : कोरोनाच्या धास्तीने पाणीही कोण देईना
वार्ताहर/ निपाणी
घरचे अठरा विश्व दारिदय़ घालवायचं. आई-वडिलांना म्हातारपणी चांगलं जीवन जगण्याची संधी द्यायची. आपलं घर व कुटुंब समृद्ध बनवायचं, अशी अनेक स्वप्ने पाहताना आम्ही गाव सोडलं होतं. कोल्हापूर येथे नोकरी करून स्वप्न पूर्ण करण्याची धडपड चालविली होती. 12-12 तासाची डय़ुटी करताना कंपनी मालकाकडून शाब्बासकीची थापही पाठी पडत होती. खोली मालक, खानावळवाला, चहा टपरीवाला अशा सर्वांकडून आदराची वागणूक मिळत होती. पण ज्यावेळी कोरोनाचं भूत मानगुटीवर बसलं, त्याचवेळी असणारी आदराची वागणूक लोप पावली आणि माणसातलं माणूसपणं हरवलं असाच काहीसा प्रत्यक्ष कटू अनुभव मिळाला.
हे अनुभव दुसऱया तिसऱया कोणाचे नाहीत तर ज्या युवकांकडे आपण देशाचे भविष्य म्हणून पाहतो. देश ज्यांच्या कर्तृत्वातून महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहतोय अशा युवकांचे हे अनुभव आहेत. अभियंते असणारे हे युवक सध्या कोरोनाच्या धास्तीने हतबल होताना कोल्हापूर ते बागलकोट असा पायी प्रवास करत आहेत. मंगळवारी सकाळी ते निपाणीत पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी हे आपले अनुभव आणि व्यथा सांगितल्या.
अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले हे युवक कोल्हापूर औद्योगिक वसाहतीत वेगवेगळय़ा कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्यावर काम करत होते. पण कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा केल्याने या युवकांच्या पायाखालची वाळूच घसरली. विनवण्या करत, घरमालकाची मनधरणी करत हे युवक गावाकडे जायचे टाळत होते. पण जेव्हा जेवणाची सोय बंद झाली. त्यावेळी मात्र त्यांना गावी परतण्याविना पर्यायच राहिला नाही. पण अशावेळी वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाल्याने सर्व मार्गच बंद झाले. डोळय़ासमोर भर दिवसाही अंधारच दिसू लागला. यातून मार्ग काढत मग त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेत वाटचाल सुरू केली.
यातील एक युवक म्हणाला, आम्ही गरीब पण कष्टकरी व स्वाभिमानी कुटुंबातून आलो आहोत. आमचे कुटुंबीय आमची डोळय़ात तेल घालून वाट पाहत आहेत. मोबाईलचे चार्जिंग संपण्याआधीच आईचा आलेला फोन पाय भरभर टाकण्यासाठी कारण ठरत आहेत. आता मोबाईल चार्जिंगविना बंद झाला आहे. चार्जिंग कराव म्हटलं तरी कोण जवळ करेना झालं आहे. यामुळे सुखरुप आहोत काळजी करु नका असं सांगायची संधीही मिळेना. तहान लागली तर पाणी मिळेना भूक लागली तर जेवण मिळेना, अशी स्थिती असतानाही घरची ओढ पाऊल पुढे टाकण्याची ऊर्जा देत आहे.
कोरोनाच संकट महाभयंकर आहे. संपूर्ण जग या संकटात सापडलयं. भारतातही रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊनचा घेतलेला निर्णयही योग्य आहे. पण आम्हासारखे कामाच्या निमित्ताने गाव सोडून आलेल्यांचा कोणीच विचार करताना दिसत नाही. सर्व काही असताना घरचे नसल्याने होणाऱया व्यथा अनुभवायला लागत आहेत. कोरोना कितीही महाभयंकर असला तरी आपल्या भारतीय संस्कृतीवर त्याचा परिणाम व्हायला देऊ नका. माणुसकी हेच भारतीय संस्कृतीचे मुळ आहे. इतके सागंत त्या युवकांनी आपला पायी प्रवास सुरू केला.
प्रत्येकाला जिद्द देण्याची गरज
बाहेर गावाहून आलेल्या पण आता कोरोनामुळे गावी परतणाऱया प्रत्येकाला जिद्द देण्याचे कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. माणुसकी हे संस्कृतीचे मूळ घट्ट करण्याची ही संधी आहे. या संधीच सोनं करण्यासाठी शासन, सामाजिक संघटना, युवक मंडळे, स्वसहाय्य संघ यांनी पुढं आलं पाहिजे. हरवत जातेय असे वाटणाऱया माणुसकीला मदतीची पालवी फूट देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. तरच असे खचणारे युवक निश्चितच उद्या विश्वासाने पुढे जातील.