लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेटीसमोर प्रश्नचिन्ह
तन्मय दाते/रत्नागिरी
बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट करणाऱया रक्षाबंधन सणावरही कोरोनाचे सावट असून अनेक भावा-बहिणींना भेटणे सोडाच राखी पाठवणेही दुरापास्त झाले आहे. यामुळे अनेकांना सोशल मिडियाचा आधार घेत ई-रक्षाबंधनावरच समाधान मानावे लागणार आहे. यंदा एकाच घरात किंवा जवळपासच्या भागात राहणाऱया बहिण-भावंडांना प्रत्यक्ष रक्षाबंधनाची संधी मिळणार आहे. लॉकडाऊन, कटेंन्मेंट झोन व यामुळेच कुरियर आणि टपाल सेवेवर आलेल्या मर्यादांमुळे रक्षाबंधनाच्या आनंदासमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचा मोठा परिणाम बाजारातील राखीच्या उलाढालीवरही झाला आहे.
बहीण भावाचे प्रेमळ नाते जोपासणारा हा सण गेल्या काही वर्षात बाजारातील वैविध्यपूर्ण राख्या, भेटी व वाहिन्यांच्या प्रभावामुळे काहीसा उत्सवी झाला होता. दुरच्या गाव, शहर किंवा राज्यातच नव्हे तर परदेशातील भावालाही सहजपणे राखी पाठवणे शक्य होते. यासाठी पोस्ट, कुरिअर सेवेसह ऑनलाईन मार्केटिंग कंपन्याही r सज्ज होत्या. मात्र कोरोनाने हे सारेच संदर्भ यावर्षी पुरते बदलून टाकले आहेत. जगभरात विविध ठिकाणी असलेले निर्बंध यामुळे पोस्ट, कुरियर व ऑनलाईन सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे राख्या टपालाने पाठवण्याचे प्रमाण फारच घटले आहे. यामुळे रक्षाबंधन ऑनलाइन किंवा व्हर्च्युअल स्वरुपात करण्यावरच अनेकांचा भर राहणार आहे.
कोरोनामुळे रक्षाबंधन साजरे करण्यावर आलेल्या मर्यादांचा विकरित परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही झाला आहे. राख्या विक्रीचे प्रमाण कमालीचे घटले आहे दरवर्षीच्या तुलनेने यंदाची उलाढाल 50 टक्केपेक्षा कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दीर्घकाळच्या लॉकडाऊनमुळे उद्योग बंद राहिल्याने यावर्षी बाजारात आलेल्या राख्यांमध्येही फारशी विविधता उपलब्ध नाही. राख्यांच्या दरात फारशी वाढ झाली नसली तरी वाहतुक खर्च वाढल्याने काही प्रमाणात दरवाढ दिसत आहे.
रत्नागिरी विभागात पोस्टाची खास वितरण व्यवस्था
कोरोनाचा प्रभाव असतानाही पोस्टाने यावर्षीदेखील राखीसाठी प्राधान्याने बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था रत्नागिरी विभागातील सर्व वितरण कार्यालयांमध्ये गेली आहे. यावर्षी एकाच शहरात राहणाऱया भावंडांनाही विविध निबंधांमुळे प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही. यासाठी पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन आणि वितरण याला प्राधान्य दिले आहे. स्पीड पोस्टमुळे लवकरात लवकर राख्या पोचवून कोरोनाच्या कठीण काळातही लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पोस्टल विभाग सज्ज झाला आहे. रक्षाबंधन सण सोमवारी 3 ऑगस्ट रोजी असल्यामुळे रत्नागिरी विभागात रविवारी सुटीच्या दिवशीही राखी वितरण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.