120 बालके बनली एकपालक : जिल्हा टास्क फोर्स, महिला बालविकासतर्फे शोधमोहीम
महेंद्र पराडकर / मालवण:
जिल्हय़ात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत जवळपास नऊशेजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या संकटाच्या घडीत अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्ती अन् पालन-पोषण करणारा आधार कायमचा गमावला आहे. देशभरात कोरोनामुळे अनेक बालकांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. सिंधुदुर्गातही आतापर्यंत शून्य ते अठरा वयोगटातील 10 बालके अनाथ झाली असून 120 बालके एकपालकी बनली आहेत. अशा बालकांना मदत व्हावी, यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला असून जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या टास्क फोर्स व जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत अशा बालकांच्या गृहभेटी घेतल्या जात आहेत.
कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. एकाच घरातील दोन किंवा तीन व्यक्तींचे निधन झाले आहे. त्यामुळे अनेक लहान मुलांवर अनाथपणाचा डोंगर कोसळला आहे. ध्यानीमनी नसताना अनेक पालकांना कोरोना झाला. आई-वडील रुग्णालयात आणि मुले घरी अशी परिस्थिती होती आणि आजही आहे. देशात शेकडो मुलांचे मायेचे छत्र हरविले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने या बालकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृतीदल स्थापन करण्याचे निर्देश दिले. कृतीदलाचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱयांकडे असून जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱयांचा यात समावेश आहे. हे कृतीदल मुल<ांना आवश्यक ती मदत आणि न्याय मिळवून देणार आहे.
सावंतवाडीत सर्वाधिक सहा बालके
सद्यस्थितीत कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील एक पालक गमावलेली बालके तसेच दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांचा शोध घेण्याचे काम जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या टास्क फोर्स व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत अशा बालकांच्या गृहभेटी केल्या जात असून सद्यस्थितीत कोरोनामुळे एकपालक झालेली 120 व अनाथ 10 मुलांची माहिती संकलित झाली आहे. शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार या बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही जिल्हा टास्क फोर्समार्फत सर्वानुमते ठराव घेऊन करण्यात येत आहेत. अनाथ 10 पैकी 2 बालके मालवण, 6 बालके सावंतवाडी, 1 बालिका कणकवली आणि 1 बालक कुडाळ येथील आहे. जिल्हय़ात अशी कोरोनामुळे पालक गमावलेली मुले आढळून आल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी 0262-228869 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. सी. म्हात्रे यांनी केले आहे.
अनाथांना सर्वतोपरी मदत करण्याचा मानस
राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्हय़ातील पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा शासनाचा मानस आहे. या सर्व बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन त्यांच्या मदत व पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. तालुकानिहाय कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी म्हात्रे यांनी सांगितले.
अनाथांना लाभाचे स्वरुप
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे संगोपन करण्यासाठी कुटुंबातील कोणताही सदस्य अथवा नातेवाईक इच्छुक नसल्यास त्या बालकाला काळजी व संरक्षणाची गरज आहे ही बाब विचारात घेऊन त्याला विहीत कार्यपद्धतीन्वये बालगृहामध्ये दाखल करण्यात येईल. या व्यतिरिक्त या बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून जमा केले जातील. अनाथ बालकांचे संगोपन करण्यासाठी त्यांचे नातेवाईक इच्छुक असतील, तर अशा बालकांना शासन निर्णय 6 जून 2021 नुसार राबविण्यात येणाऱया बाल संगोपन योजना अनुज्ञेय राहील. तसेच बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून जमा केली जाईल. ही मुदत ठेव बालक आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या नावे असणाऱया सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
जिल्हय़ात कोविडने 153 जणींना वैधव्य
जिल्हय़ात कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांची संख्या 153 एवढी झाली आहे. यात कुडाळ तालुक्यात 26, देवगड 39, मालवण 19, सावंतवाडी 25, वेंगुर्ले 19, वैभववाडी 06, कणकवल्नी 18, तर दोडामार्ग 1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आहे. जिल्हा महिला व बालविकास समितीमार्फत विधवा महिलांची माहिती संकलित केली जात आहे. तरीही अद्याप ज्या विधवा महिलांची नोंद झालेली नसेल किंवा ज्यांच्या पतीचे निधन जिल्हय़ाबाहेर झाले असल्यास अशा महिलांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून अशा विधवा महिलांना उद्भवणाऱया समस्या सोडविण्यासाठी शासन यंत्रणेमार्फत तातडीने हालचाली करता येऊ शकतील.