पॉझिटीव्हिटी दर 31 वरून 7.47 टक्क्यांपर्यंत खाली : .. तर सर्वच दुकाने सायंकाळी चारपर्यंत शक्य – जिल्हाधिकारी
- जिल्हय़ात 62 गावे कोरोना हॉटस्पॉट
- ग्रामविलगीकरण कक्षात 5,143 बेड उपलब्ध
- म्युकरमायकोसीसचे तीन रुग्ण, अजून सात संशयित
- एक लाख 70 हजार बालके निरीक्षणाखाली
- पोलीस यंत्रणा 24 तास अलर्ट – राजेंद्र दाभाडे
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 31 टक्क्यांवरून 7.47 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून लवकरच जिल्हय़ाचा चौथ्या टप्प्यातून तिसऱया टप्यात प्रवेश होईल. त्यानंतर सर्व दुकाने खुली करता येतील तसेच जिल्हय़ात कोरोना रुग्ण वाढ रोखण्यासाठी 20 पेक्षा जास्त रुग्ण असलेली 62 गावे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर ग्रामविलगीकरण कक्ष स्थापन करून 5 हजार 143 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. म्युकरमायकोसीसचे तीन रुग्ण आढळले असून अजून सात संशयित रुग्ण आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हय़ातील 1 लाख 70 हजार बालके निरीक्षणाखाली असून कुडाळ महिला रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र वार्ड करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकाऱयांनी ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हय़ात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हय़ासह कोकणातील सर्वच जिल्हय़ांत कोरोनाचे रुग्ण कमी होते. जिल्हय़ात दुसरी लाट उशिराने सुरू झाली. त्यामुळे काही जिल्हय़ात रुग्ण कमी झाले, तरी सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रुग्ण वाढत होते. वैद्यकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार काही ठराविक काळ रुग्णवाढीचा असतो. त्याप्रमाणे जिल्हय़ात रुग्ण वाढ होत होती, मात्र आता ती हळूहळू कमी होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जिल्हय़ाचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 31 टक्क्यांपर्यत गेला होता. तो आता 7.47 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरू लागली आहे, हे स्पष्ट होते. लवकरच याबाबत राज्य शासनाकडून आठवडय़ाचा पॉझिटिव्हीटी दर जाहीर झाल्यावर जिल्हा चौथ्या टप्यातून तिसऱया टप्यात प्रवेश करेल. त्यानंतर जिल्हय़ातील सर्वच दुकाने चार वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्ण लवकर दाखल होणे आवश्यक
जिल्हय़ाचा मृत्यू दर इतर जिल्हय़ांच्या मानाने कमी आहे. तरी सुद्धा 2.5 टक्के हा वाढलेलाच आहे. यामागे अनेक कारणे असून रुग्ण उशिराने उपचारासाठी दाखल होतात तसेच विविध आजाराने व्याधीग्रस्त असतात. व्यसन, लठ्ठपणा अशी विविध कारणे आहेत. परंतु सर्वात महत्वाचे कारण म्हणजे उशिराने रुग्ण दाखल होतात. ते वेळेत दाखल झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. तरीदेखील आरोग्य यंत्रणा मृत्यू रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. आता चार फिजिशियन डॉक्टर सुद्धा जिल्हय़ात दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
62 गावे बनली कोरोना हॉटस्पॉट
जिल्हय़ातील वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी वीसपेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेली गावे कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात येऊन या गावात विशेष लक्ष घातले जात आहे. त्या गावांमध्ये टेस्टिंगचे प्रमाण वाढविले जाणार आहे. हॉटस्पॉट ठरलेली 62 गावे ही कुडाळ तालुक्मयात सर्वाधिक 15, दोडामार्ग चार, सावंतवाडी आठ, देवगड चार, कणकवली 13, मालवण 11, वेंगुर्ले सहा, वैभववाडी एक. रुग्ण कमी होतील, तशी हॉटस्पॉटमधील गावेही कमी होतील, अशी माहिती देण्यात आली.
ग्रामविलगीकरण कक्षामध्ये 5,153 बेड उपलब्ध
होम आयसोलेशन बंद करण्यात आल्याने प्रत्येक गावात ग्रामविलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून 5 हजार 143 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाची लक्षणे नसणाऱया किंवा सौम्य लक्षणे असणाऱया रुग्णांना ग्रामविलगीकरण कक्षामध्ये दाखल केले जात आहे. कक्ष स्थापन करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामनियंत्रण समित्यांमार्फत चांगले सहकार्य मिळत आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.
म्युकरमायकोसीसचे तीन रुग्ण आढळले, सात संशयित
जिल्हय़ात म्युकरमायकोसीसचे तीन रुग्ण आढळले असून सीपीआर रुग्णालय कोल्हापूर व गोवा येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजून सात संशयित रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली तसेच ज्या रुग्णांना हेव्ही डाययबेटीस आहेत. त्यांना म्युकरमायकोसीसचे धोका अधिक आहे. अशा लोकांनी रोजच्या रोज डायबेटिसची टेस्ट करणे आवश्यक आहे. तसेच मास्क सुद्धा वारंवार बदलणे व स्वच्छ धुणे आवश्यक आहे, अशीही माहिती देण्यात आली.
पोलीस यंत्रणा 24 तास अलर्ट
कोरोनाच्या संकट काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच जिल्हय़ातील नागरिकांनी नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा 24 तास अलर्ट असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. तसेच जिल्हय़ात दरदिवशी एक हजार लोक जिल्हय़ात प्रवेश करीत असतात. अशावेळी पोलीस अतिशय दक्ष राहून काम करीत आहेत. जिल्हय़ात गोव्यातून येणारी अवैध दारू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यात येत असून लाखो रुपयांचा दंड करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकावरही पोलीस तैनात आहेत आणि दिवस-रात्र काम करणाऱया पोलिसांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी 95 टक्के पोलिसांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचे आरोग्य संस्थांनी जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पूर्वतयारी सुरू केली असून अकरा वर्षांखालील 1 लाख 70 हजार बालके आहेत. ही सर्व बालके निरीक्षणाखाली आहेत. या बालकांना सर्व प्रकारचे डोस देण्यात आले का, याचीही माहिती घेण्यात येत आहे. कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे बालकांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच जिल्हय़ात ऑक्सिजन रिफिलिंग प्लान्ट उभारला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.