एकीकडे सातारा जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या 6 झाली. त्यातील कॅलिफोर्नियावरुन आलेल्या वृध्दाला दुर्दैवाने मृत्युला सामोरे जावे लागले. त्या पहिल्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूने सातारा हादरला. मात्र, या सर्व चिंतेच्या वातावरणात बुधवारी सकाळी दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली. त्या बातमीने जिल्हावासियांना कोरोनाविरुध्द लढण्याचे बळ दिले. जिल्हयात पहिले दोन बाधित रुग्ण समोर आले त्यातीलच ही महिला. या सातारच्या वाघिणीने कोरोनावर मात केली असून उपचारानंतर पूर्ण बरी झाली आहे. बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातून सर्व डॉक्टर्स, नर्सेसनी टाळय़ांचा गजरात तिला निरोप दिला. दरम्यान, 39 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून बुधवारी नवीन 66 अनुमानित दाखल झाले असून यापैकी 15 साताऱयात तर 51 कराडमध्ये असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान निजामउद्दीन येथे मरकजसाठी गेलेल्या साताऱयातील 38 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
24 तारखेपासून लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर साताऱयात हळूहळू अनुमानित रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र त्यांचे रिपोर्ट कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत होते ही दिलासादायक बाब होती. तरीही संभाव्य धोका ओळखून प्रशासन लॉकडाऊन करण्याच्या तयारीत होते. तेवढय़ातच जिल्हय़ात पहिला रुग्ण कोरोना बाधित आढून आला आणि मग लॉकडाऊन गांभिर्याने घेण्याची गरज निर्माण झाली. तेवढय़ात दुसरी एक 45 वर्षीय महिला देखील कोरोना बाधित झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या दोन झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनातील सहकाऱयांच्या साथीने लॉकडाऊन पूर्णपणे करण्यासाठी पावले उचलली.
तोपर्यंत जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यात पुणे, मुंबईहून चाकरमानी गावाला कुटुंबकबिल्यासह परतू लागले होते. प्रशासनावर प्रचंड ताण वाढला होता. पोलीस प्रशासन संचारबंदी यशस्वी करण्यासाठी जीवाची बाजी लावून रात्रंदिवस मेहनत घेत होते. त्यांना गावोगावचे पोलीस पाटील, सरपंच मदत करत होते. आरोग्य विभागाने सर्व्हेचे काम जोखीम अंगावर घेत सुरु केले. दुसरीकडे लोकांना मात्र लॉकडाऊनचे गांभीर्य वाटत नव्हते. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले मुंबईहून आलेले काही रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. जिल्हय़ात बाधितांची संख्या 6 वर गेल्यानंतर लोकांना गांभीर्य येवू लागले आहे. कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढत असतानाच पहिल्या दोन कोरोना बाधितांचे 14 दिवसानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी आली. त्यांचा 15 दिवसांचा रिपोर्ट येण्याच्या तयारीत असतानाच त्यातील एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मग जिल्हय़ावर कोरोनाचे सावट चांगलेच घोंगावू लागले आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटाईजर्स वापर, घरातच बसणे याची गंभीरता कळून चुकली आणि लोक प्रशासनाला सहकार्य करु लागले आहेत.
टाळय़ांच्या गजरात दिला निरोप
सातारा जिह्याची पहिली कोरोना बाधित महिला झाली ठणठणीत बरी. कोरोना मुक्त जिह्यातली पहिली रुग्ण. पुष्प गुच्छ देवून आणि टाळ्या वाजवून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयातून निरोप दिला. कोरोना मुक्त महिलेने रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स यांचे यावेळी आभार मानले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने, डॉ. धुमाळ, डॉ. बक्षी, डॉ. जाधव, डॉ. देशमुख, डॉ. सुपेकर, डॉ. हिरास, मेट्रोन श्रीमती चव्हाण यांच्या नर्सिंग स्टाफ, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱयांचे कौतुक करून अभिनंदन केले.
डॉक्टरांच्या सहकार्याने तिने यशस्वीपणे लढा दिला
कोरोना बाधित झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तिच्यावर उपचार सुरु होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी झगडत होती. मात्र एका रुग्णाला मृत्यूला सामोरे जावे लागले तरी दुसरा रुग्ण खडखडीत बरा होवून घरी गेल्याने डॉक्टर्स, नर्सेस यांनी घेतलेल्या परिश्रमाला मोठे यश मिळाले. त्या महिलेने कोरोनाविरुध्द यशस्वीपणे दिलेला लढा प्रेरणादायी ठरला असून नागरिकांनी देखील आता लॉकडाऊन यशस्वी करुन संसर्गच होवू नये यासाठी असाच लढा देवून जिंकायचे आहे हाच संदेश हनुमान जयंतीचा दिवस सर्वांना देवून गेला.
पुणे, मुंबईकरांवर होणार गुन्हे दाखल
पहिले दोन बाधित रुग्ण हे परदेशातून संसर्ग होवून आले होते. मात्र, त्यानंतरचे रुग्ण हे पुणे व मुंबईतून संसर्गित होवून आलेत. त्यामुळे पुणे व मुंबईवरुन आलेल्या भूमीपुत्रांची जबाबदारी वाढली असून त्यांनी नोंदणी केली नसल्यास तातडीने नोंदणी करावी व काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. नोंदणी केली नसलेल्या मुंबईकरांनी नोंदणी करावी तसेच त्यांनी घराबाहेर पडू नये ही सक्त सूचना आहे. याबाबत तक्रारी आल्यास आता पुणे, मुंबईहून आलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील अशा पुणे, मुंबईकरांची माहिती 1077 या क्रमांकावर नाव, मोबाईल क्रमांकासह कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
छोटे यश मिळालेय, युध्द संपलेले नाही
कोरोनाविरुध्दच्या लढाईत दुबईहून आलेल्या पहिल्या बाधित महिलेचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ती कोरोनामुक्त झाली असे समजून तिला डिस्चार्ज दिलेला आहे. तिच्यावर दिवसरात्र अथक मेहनत घेवून उपचार करणाऱया सिव्हिलच्या डॉक्टर्स, नर्सेसचे अभिनंदन. तसेच जिल्हय़ातील सर्व आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणेला धन्यवाद व्यक्त करतानाच कोरोनाविरुध्दच्या लढाईत मिळालेले हे पहिले छोटे यश आहे. युध्द अद्याप संपलेले नसून जिल्हय़ातील सर्व नागरिकांनी तसेच विशेषतः पुणे, मुंबईकरांनी सोशल डिस्टन पाळणे, मास्क वापरणे, क्वारंटाईन असणाऱयांनी घराबाहेर न फिरणे या गोष्टी अधिक गांभीर्याने करावयाच्या आहेत. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेच लागणार असून सर्वांनी जबाबदारीने वागून हे युध्द जिंकायचे आहे.
शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा
39 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 66 अनुमानित दाखल
सातारा जिह्यात 6 एप्रिल रोजी रात्री उशिरा दाखल असलेल्या 32 अनुमानित रुग्णांचे व दि.7 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या 7 अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे. तर जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित असलेल्या 8 ते 70 वर्ष वयोगटातील 11 पुरुष व 4 महिला अशा 15 नागरिकांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तसेच कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे कोरोना बाधित निकट सहवासित असणाऱया 1 ते 80 वर्ष वयोगटातील 31 पुरुष व 17 महिला असे एकूण 48 नागरिकांना व 1 ते 23 वर्ष वयोगटाती 3 महिलांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व 66 अनुमानितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने बी. जे. महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.