अमिताभ बच्चनचा आवाज हटविण्याची मागणी : दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या काळात तुम्ही कोणालाही फोन लावल्यानंतर पलीकडून अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ‘नमस्कार, आज हमारा पूरा देश और विश्व कोरोना की चुनौती का सामना कर रहा है। कोव्हिड 19 अभी खत्म नहीं हुआ है…।’, ही कोरोना विषाणूविरुद्ध सावधगिरी बाळगण्याबाबत कॉलर टय़ून ऐकायला येते. या कॉलर टय़ूनविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर कॉलर टय़ून कधी बंद होणार? असा प्रश्न याचिकाकर्त्याने केला आहे. तसेच अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या आवाजात कॉलर टय़ून काढून टाकण्याची विनंतीही केली आहे.
स्वत: आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना या विषाणूची लागण झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. अमिताभ बच्चन हे समाजसेवक म्हणून देशाची सेवा करीत नाहीत, असा आरोपही याचिकेत केला आहे. ही याचिका गुरुवारी मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आणण्यात आली. यावरील पुढील सुनावणी 18 जानेवारी रोजी होणार आहे.