अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीतसिंग संधू यांचे अमेरिकेतील कार्यक्रमात प्रतिपादन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
जगावर कोसळलेल्या कोरोना संकटाला भारत आणि अमेरिका एकमेकांशी दृढ सहकार्य करून एकत्रितरित्या तोंड देत आहेत, असे प्रतिपादन अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीतसिंग संधू यांनी केले आहे. ते भारतीय वंशाच्या प्रतिष्ठित अमेरिकन व्यक्तींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुरूवारी बोलत होते.
हा कार्यक्रम व्हर्चुअल पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. दोन्ही देश आरोग्य, जैवविज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात एकमेकांना उत्कट सहकार्य करीत आहेत. भारतातील वैज्ञानिक संस्था, संशोधन प्रयोगशाळा आणि अमेरिकेतील संस्था एकमेकंच्या सातत्याने संपर्का आहेत. कोरोनाच्या संकटावर उपाय योजना शोधून काढण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांचे एकमेकांना सहकार्य आहे, असे ते म्हणाले.
लस शोधण्याचा प्रयत्न
कोरोनावर लस तसेच औषध शोधण्याचा जीव तोडून प्रयत्न सुरू आहे. लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी यासाठी संशोधक आपली बुद्धी पणाला लावत आहेत. कोरोनाच्या काळात भारताने जगाला प्रामाणिक आणि उत्स्फूर्त सहकार्य केले. त्यामुळे भारताबद्दल जगाला अधिकच विश्वास वाटू लागला. आमच्या औषध कंपन्या अमेरिकेच्या औषध कंपन्यांशी सहकार्याने कार्य करीत आहेत. अमेरिकेच्या गिलीड या कंपनीने भारताच्या सात कंपन्यांना रेमडेसिव्हीर या औषधाचे उत्पादन आणि वितरण करण्याची अनुमती दिली आहे.
भारत हा एक विश्वासू सहकारी आणि भागीदार राहिला असून त्याचे प्रत्यंतर या संकटात आले, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताने जगातील 150 देशांना या काळात औषधे पुरविली. यात अमेरिका, ब्राझील अशा देशांचाही समावेश होता, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
नवी परिमाणे
कोरोना संकटामुळे जग बदलले असून नवी परिणामे विचारात घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रांमधील सहकार्याच्या परिभाषा बदलल्या आहेत. अशा स्थितीत भारत व अमेरिका या दोन्ही देशांनी एकत्रित कार्य करणे याला अनन्यसाधारण महत्व आहे. भारताने लवकर लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने रोगाचा प्रसार वेगाने झाला नाही. आता देश हळूहळू निर्बंधांमधून मोकळा होत आहे. रोगही आटोक्यता आणायचा आणि अर्थव्यवस्थाही सांभाळायची ही कसरत आम्ही यशस्वीरित्या करीत आहोत, असे त्यांचे प्रतिपादन होते.