कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या 16 दिवसांत देशात 10 लाख जणांना याची बाधा झालेली आहे. यामागचे एक कारण अनलॉक किंवा न्यूनॉर्मल हे असल्याचे सांगितले जात असले तरी आता मुंबईतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) च्या संशोधकांनी मांडलेले मतही विचारात घ्यावयास हवे. त्यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार पावसाळ्याती दमटपणा आणि आर्द्रतेमुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका वाढतो आहे.
या अभ्यासानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली की आर्द्रता जास्त असल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून आणि शिंकेतून बाहेर पडणार्या द्रव पदार्थाचे थेंब सुकण्यास अधिक कालावधी लागतो. त्यामुळे विषाणू दीर्घकाळ नष्ट होत नाहीत आणि संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो.
मुंबईतील सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस संस्थेच्या वैज्ञानिकांच्या मते, कोणताही विषाणूजन्य आजार फैलावण्याची तीन प्रमुख कारणे असतात. वातावरणात होणारे बदल, मानवी वर्तणूक आणि विषाणूचा संसर्ग पसरण्याची क्षमता. भारतात उन्हाळ्यात रूग्णांची संख्या कमी आहे, पावसाळ्यात या संख्येत वाढ झालेली दिसली.
हा बदल लक्षात घेऊन हिवाळ्याच्या दृष्टीने आत्तापासून सावध राहाण्याची गरज आहे.