प्रतिनिधी / कोल्हापूर
कर्नाटक सरकारने इदरगौंड येथील सद्भावना मराठी संमेलनाला विरोध करून मराठीवर अन्याय केला आहे. संमेलनाचे संयोजक, पाहुण्यांना गावाबाहेरच अडवून कर्नाटक सरकारने दडपशाहीचे दर्शन घडवले. कर्नाटक सरकारची ही मुस्कटदाबी म्हणजे नवी हिटलरशाही आहे, अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.
बेळगाव जिल्हय़ातील इदरगौंड (ता. खानापूर) येथे सातारा जिल्हय़ातील मसुर (ता. कराड) येथील गुंफण फौंडेशनने रविवारी सद्भावना मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सबनीस यांची उपस्थिती होती. पण संमेलनाचे उद्घाटन होण्यापुर्वीच कर्नाटक पोलिसांनी गावात जाणारे रस्ते अडवले, संयोजकांना अटक करण्याची धमकी दिली, पाहुण्यांनाही अडवले, त्यामुळे संमेलन अन्यत्र घेतले. याचा डॉ. सबनीस यांनी बेळगावमध्ये निषेध केला.
माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सबनीस यांनी कोल्हापुरात रविवारी दसरा चौकात कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीचा निषेध नोंदवला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सद्भावना संमेलन ‘गुंफण’ने आयोजित केले होते. पण कर्नाटक सरकारला या सद्भावनेचे मुल्य समजले नाही. त्यांनी या संमेलनाला कोंडीत पकडले. सद्भावना घेऊन येणारी संस्था समजत नसेल तर हे सरकार संवेदनक्षम कसे, असा प्रश्न त्यांनी केला.
सर्वच भाषांतील लेखक इमानदारीने लेखन करतात, पण या सद्भावना संमेलनाचे मुल्य कर्नाटक सरकारला पचवता आले नाही. संमेलनाला विरोध करून सत्य मांडण्यास सरकारने विरोध केला आहे. आपण कन्नड साहित्यातील कनकदास, शिवराम कारंथ, भैरप्पा, गिरीष कर्नाड यांना अभिवादन करण्यासाठी आलो होतो. संत, महापुरूषांचे मराठीचे संचित घेऊन सद्भावनेची पुण्याई घेऊन गेलो. पण कर्नाटक सरकारच्या पापी वृत्तीने आपल्याला धक्का बसला. कन्नड बांधव आपले शत्रू नाहीत, कन्नडचा द्वेष आपण करणार नाही. पण मराठीवरचा अन्यायही सहन करणार नाही. बेळगाव सीमाप्रश्न महाराष्ट्राशी जोडला गेला आहे. त्यामुळे तेथील मराठी बांधवांच्या वेदना जाणून घेणे, हे आपले कर्तव्य आहे. मराठी माणसाचा हक्क संरक्षित रहावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रातील डाव्या-उजव्या पक्षांनी मिळून सीमाप्रश्न सोडवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समजते, सद्भावना संमेलन उधळून लावण्याच्या घटनेतून कर्नाटक सरकारच्या रूपात अद्यापी हिटलरशाही जिवंत दाखवून दिले आहे. याविरोधात संस्कृती संचितासाठी मराठी माणूस उभा राहिल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले.