सलग दोन दिवस अतिवृष्टी : गुरूवारी पावसाची काहीअंशी उघडीप
गगनबावडय़ात सर्वाधिक 243 मिमी पाऊस, पंचगंगा धोक्याच्या पातळीवर, 102 बंधारे पाण्याखाली,
9 राज्य मार्गांसह 34 मार्ग बंद : पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू
‘एनडीआरएफ’च्या दोन तुकडय़ा दाखल ः मदतकार्य सुरू
राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 31922 क्युसेक विसर्ग,
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात संततधारेचा ओघ गुरूवारी काहीसा मंदावला, पण धरणक्षेत्रातील अतिवृष्टीने पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ झाली. गुरूवारी सकाळी पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरवर ‘महापुराचे संकट’ उभे आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हय़ात एनडीआरएफच्या दोन तुकडय़ा दाखल झाल्या. सायंकाळी मदतनकार्यास सुरूवातही झाली. संथगतीने पाणीपातळी वाढत असली तरी प्रशासनाच्या सतर्कतेचा आदेश दिला आहे. गगनबावडा तालुक्यात 24 तासांत 243 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महापुराने जिल्हय़ातील 102 बंधारे पाण्याखाली गेल्याने 34 मार्ग बंद झाले. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पुराचा धोका असलेल्या 23 गावांतील 1750 कुटुंबांना युद्धपातळीवर स्थलांतरीत केले आहे. यामध्ये चंदगड तालुक्यातील 97 तर शहरातील 20 कुटुंबांचा समावेश आहे.
जिल्हय़ात 9 राज्य मार्गासह 34 मार्गावरील वाहतूक बंद
संततधारेमुळे नद्यांना पूर आल्याने जिल्हय़ातील 102 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे 9 राज्य मार्गांसह 34 जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले
राधानगरी धरणाचे 3 व 6 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे गुरूवारी सायंकाळी खुले झाले. त्यातून प्रति सेकंद 2846 क्युसेक आणि वीज निर्मिती प्रकल्पातून 1400 क्युसेक असे 4256 क्युसेक विसर्ग सुरु आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रताप माने यांनी दिली. धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणात 65.657 टीएमसी तर अलमट्टी धरणात 94.362 इतका पाणीसाठा आहे.
गगनबावडासह 8 तालुक्यांत सलग दुसऱया दिवशी अतिवृष्टी
जिह्यात गुरूवारी गेल्या 24 तासात पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, करवीर, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली. जिल्हय़ात गुरूवारी झालेल्या अन् एकूण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये ( एकुण पाऊस) अशी, ः हातकणंगले 65.13 (332.38), शिरोळ 48.43 (273.57), पन्हाळा 99.43 (852), शाहूवाडी 88.33 (1100.17), राधानगरी 152.17 (1208), गगनबावडा 243 (3164), करवीर 115.36 (680.64), कागल 129.86 (883.14), गडहिंग्लज 65.57 (602.14), भुदरगड 89 (945.60), आजरा 144.50 (1338.25), चंदगड 145.17 (1318) अशी नोंद आहे.
राधानगरी धरणात 227.09 द.ल.घ.मी. पाणीसाठा
राधानगरी धरणाच्या वीज प्रकल्पातून 1400 तर अलमट्टी धरणातून 31922 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणात 227.09 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
जिह्यातील धरणांमधील पाणीसाठा
जिल्हय़ातील लघु, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठी दशलक्ष घनमीटरमध्ये असा ः तुळशी 67.7, वारणा 796.12, दूधगंगा 569.58, कासारी 64.43, कडवी 53.71, कुंभी 64.03, पाटगाव 85.38, चिकोत्रा 25.50, चित्री 39.47, जंगमहट्टी 34.65, घटप्रभा 44.17, जांबरे 23.23, कोदे 6.06 असा आहे.
बंधाऱयांची पाणी पातळी
जिल्हय़ातील प्रमुख बंधाऱयांतील पाणीपातळी फुटांमध्ये अशी ः राजाराम 41.2, सुर्वे 39.7, रुई 66.9, इचलकरंजी 61.6, तेरवाड 54.6, शिरोळ 48, नृसिंहवाडी 44, राजापूर 34.9 तर सांगली 20.6 व अंकली 24.8 फूट अशी आहे.
जिल्हय़ातील 102 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील ः शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील ः शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, वारणा नदीवरील ः चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगाव व चावरे कुंभी नदीवरील ः शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज, सांगरूळ, कळे, कातळी व वेतवडे, धामणी नदीवरील ः सुळे, अंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील ः कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा नदीवरील ः निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली, शेलोली व करडवाडी, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे, हिरण्यकेशी नदीवरील ः साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, सुळेरान, दाभीळ, हरळी, खणदाळ, देवर्डे, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, गजरगांव व जरळी, ताम्रपर्णी नदीवरील ः कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, माणगाव, कोकरे, न्हावेली, उमगाव व कामेवाडी, घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगांव गवसे, कानडे सावर्डे, अडकूर, तारेवाडी व कानडेवाडी, तुळशी नदीवरील ः बाचणी, आरे व बीड, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे असे 102 बंधारे पाण्याखाली आहेत.
23 गावांमधील 1750 कुटुंबे, 4413 जण सुरक्षित स्थळी ः जिल्हाधिकारी
महापुराच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी जिल्हा प्रशासनाने 23 गावातील नदीकाठच्या 1750 कुटुंबातील 4413 जणांना आणि 1100 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
23 गावांतील स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय संख्या अशी ः गडहिंग्लज बाधित गावे ः 2, 5 कुटुंबातील 21 व्यक्ती, 14 जनावरे. पन्हाळा बाधित गावें 2 ः 3 कुटुंबातील 14 व्यक्ती एका जनावरे. करवीर 3 बाधित गावे ः 1603 कुटुंबातील 3850 व्यक्ती आणि 1038 जनावरे स्थलांतरीत, गगनबावडा बाधित 8 गावे ः 21 कुटुंबातील 68 जणांचे स्थलांतर, आजरा तालुक्यातील सुळेरानमधील 1 कुटुंबातील 9 जणांचे स्थलांतर झाले आहे. चंदगड तालुक्यातील बाधित 6 गावांतील 97 कुटुंबातील 377 व्यक्ती 47 जनावरांचे स्थलांतर केले आहे. कोल्हापूर शहरातील 20 कुटूंबातील 74 जणांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात स्थलांतरीत केले आहे.