इचलकरंजी / प्रतिनिधी
रस्त्याकडेच्या बाकड्यावर बोलत बसलेल्या तिघांच्या अंगावर ऊसाने भरलेली ट्रॉली पलटली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. सर्व जखमीना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण एकाचा उपचारापूर्वीच मृृत्यू झाला. प्रेमचंद अशोक काडाप्पा (वय ५२ रा.पंचगंगा फॅक्टरी रोड कबनुर) असे त्याचे नाव आहे. तर दोघा गंभीर जखमी पैकी दिलीप महादेव आवळे ( वय 55, रा. आवळे गल्ली, कबनूर) याला कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात तर उदय संभाजी इंगवले ( वय 50, रा. परिट गल्ली, कबनूर) याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी रात्री कबनुर गावनजीकच्या पंचगंगा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या नवीन बाय पास रस्त्यावर घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मृत प्रेमचंद्र काडाप्पा आणि जखमी दिलीप आवळे, उदय इंगवळे हे तिघे जण पंचगंगा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या नवीन बाय पास रस्त्याकडेला असलेल्या बाकड्यावर बोलत बसले होते. याच दरम्यान ऊसाने भरलेला दोन ट्रॉल्या घेवून भरधावपणे ट्रॅक्टर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. यावेळी ट्रॅक्टर चालकाने भरधावपणे बाय पास रस्त्यावर वळण घेतले. यावेळी ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या रस्त्याकडच्या बाकड्यावर बोलत बसलेल्या तिघाच्या अंगावर उलटल्या. त्यामुळे हे तिघे ऊसाखाली गाडले गेले. या अपघाताची माहिती समजताच गावातील युवकानी घटनास्थळी धाव घेतली. ऊसाखाली गाडल्या गेलेल्या तिघाचा ऊसाचा ढिगारा बाजूला करीत शोध सुरु केला. बराच वेळाने या तिघाना शोधण्यास यश आले. पण हे तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी आयजी एम रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वी प्रेमचंद्र काडाप्पा यांचा मृत्यु झाला.यांची शिवाजीनगर पोलीसात सोमवारी रात्री उशिरा पर्यत नोंद करण्याचे काम सुरु होते.