दिल्लीतील न्यायालयाचा आदेश,
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाला हादरविलेल्या 2008 मधील बाटला हाऊस हत्या प्रकरणातील आरोपी अरीझ खान जुनैद याला येथील सत्र न्यायालयाने (सेशन्स कोर्ट) फाशीची शिक्षा देण्याचा आदेश दिला आहे. त्याच्यावर पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा याची हत्या केल्याचा आरोप होता. या घटनेत दोन दहशतवादीही ठार झाले होते.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी आरोपीला ही शिक्षा सुनावली. हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने आरोपीला कोणत्याही प्रकारची दया दाखवून जिवंत राखता येणार नाही. पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांची हत्या आरोपीने अत्यंत थंड डोक्याने योजना आखून केली असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. या प्रकरणी सरकारची बाजू ए. टी. अन्सारी या वकीलांनी, तर आरोपीची बाजू एम. एस. खान यांनी मांडली. आरोपीवर आयपीसीचे अनुच्छेद 186, 333, 353, 302, 307, 174 अ आणि 34 अंतर्गत गुन्हा सादर करण्यात आला होता.
घटना काय होती ?
19 सप्टेंबर 2008 या दिवशी दिल्लीतील बाटला हाऊस येथे इंडियन मुजाहिद्दिनचे, अतीफ अमीन आणि मोहम्मद सज्जाद यांना एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले होते. याच चकमकीत दिल्लीचे पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा तसेच त्यांचे दोन सहकारी कॉन्स्टेबल्स बलवंतसिंग आणि राजबीर सिंग यांचाही मृत्यू झाला होता. बाटला हाऊस इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 108 मध्ये दान दहशतवादी आहेत अशी माहिती गुप्तचरांनी दिल्याने मोहनचंद शर्मा त्यांना अटक करण्यासाठी तेथे आपल्या सहकाऱयांसह गेले होते. त्यावेळी आरोपी अरीझ खान याने त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत दोन दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आले होते. तथापि, अरीझ खान पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.
2018 मध्ये अटक
फरारी अरीझ खान याला 2018 मध्ये उत्तराखंड राज्यातील बनबासा येथे अटक करण्यात आली. हा भाग नेपाळलगत आहे. खान याने नेपाळचे नागरिकत्वही तोपर्यंत मिळविले होते आणि तो नेपाळ व भारतात येऊन जाऊन होता. त्याने नेताळचे नागरीकत्व कार्ड आणि पासपोर्ट मोहम्मद सलीम या बनावट नावाने मिळविला होता, हे नंतर स्पष्ट झाले. 2013 मध्ये दिल्लीतील सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी शहजाद अहमद याला जन्मठेप दिली होती. आता मुख्य आरोपी अरीझ खान यालाही शिक्षा झाल्याने या प्रकरणी न्याय मिळाल्याची भावना मोहनचंद शर्मा यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
राजकीय वळण
या सर्व प्रकरणाला त्यावेळी मोठे राजकीय वळण मिळाले होते. एन्काऊंटरमध्ये मारले गेलेले दहशतवादी हे दहशवादी नव्हतेच, तर ते निरपराध तरूण होते असा दावा स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणाऱया अनेकांनी केला होता. तसेच त्यावेळच्या काँगेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या डोळय़ात या दहशतवाद्यांच्या मृत्यूमुळे पाणी आले होते, असेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. काँगेस नेते दिग्विजय सिंग यांच्यावरही दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा आणि सहानुभूती दाखविण्याचा आरोप झाला होता. दिल्ली पोलिसांवरच या प्रकरणाचे खापर फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, अरीझ खान याला दोषी ठरविण्याऱया न्यायाधीशांनी एन्काऊंटर योग्यच होता असा निर्वाळा दिला आहे.