हातकणंगले तालुक्यातील 21 गावांची मुदत संपणार
प्रतिनिधी/चंदूर
राज्यातील 19 जिल्ह्यातील 1566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल 2020 ते जून 2020 दरम्यान संपली आहे. 12668 ग्रामपंचायतींची मुदत जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीदरम्यान संपणार आहे. अशा ग्रामपंचायतींच्या वर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची निवड करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. हातकणंगले तालुक्यातील 21 गावांची मुदत संपणार असून प्रशासक निवडीला आता वेग येणार आहे.
हातकणंगले तालुक्यातील दुर्गेवाडी, वाठार तर्फे वडगाव, खोची, बिरदेव वाडी, कुंभोज,नेज, हालोंडी, जंगमवाडी ,चंदुर, कबनूर, माणगाव, माणगाव वाडी, रुई, पाडळी, लाटवडे, मिणचे, तासगाव, किणी, मनपाडळे, आदी गावांची मुदत 6-8- 2020 रोजी संपणार आहे. तर वाठार तर्फे उदगावची मुदत 13-8- 2020 ला संपणार आहे व तिळवणी गावची मुदत 26 -11- 2020 रोजी संपणार आहे
सन 2020 चा महाराष्ट्र सरकार अध्यादेश क्रमांक दहा दिनांक 25 जून 2020 नुसार नैसर्गिक आपत्ती ,आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी, महामारी किंवा प्रशासकीय अडचणीमुळे जर राज्य निवडणूक आयोगाला वेळापत्रकानुसार निवडणुका घेता आल्या नाहीत तर राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतींचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 151 मधील पोटकलम 1 मध्ये खंड क मध्ये तरतूद करण्यात आली आहे. प्रशासक नेमणूक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचा सल्ला व शिफारस घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीवर ज्या प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित होते त्याच प्रवर्गाचा व्यक्ती प्रशासक पदाच्या दावेदार असेल व प्रशासक म्हणून ज्या व्यक्तीची निवड करायची आहे.
तो व्यक्ती गावचा रहिवाशी व त्याचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुदत संपलेले सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्यांना प्रशासक म्हणून काम पाहता येणार नाही किंवा त्यांची निवड करता येणार नाही.गावच्या सरपंचाचे जे अधिकार आहेत त्याला जो भत्ता व मानधन आहे ते सर्व प्रशासकास लागू राहतील व ज्या दिवशी निवडणुका होऊन ग्रामपंचायत अस्तित्वात येईल त्या दिवसापासून प्रशासकाचे अधिकार व पद तात्काळ संपुष्टात येईल.