प्रतिनिधी/ बेळगाव
दसरा व दिवाळीच्या उत्सवासाठी रेल्वे मंत्रालयाने उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केल्या होत्या. यामध्ये कोल्हापूर – तिरूपती (रेल्वे क्र. 07415/16) या बेळगाववरून धावणाऱया रेल्वेचाही समावेश होता. परंतु या रेल्वेला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ही रेल्वे अवघ्या 16 व्या दिवशी रद्द करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे. गुरुवार दि. 12 नोव्हेंबरपासून ही रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोल्हापूर, मिरज, बेळगाव, हुबळी या परिसरातील भाविकांना तिरूपती येथील बालाजीचे दर्शन घेता यावे यासाठी सात महिन्यानंतर कोल्हापूर-तिरूपती हरिप्रिया एक्स्प्रेस उत्सव स्पेशल म्हणून सुरू करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे कमी न झाल्यामुळे अद्यापही पर्यटनासाठीचा उत्साह दिसून येत नाही. या रेल्वेला लॉकडाऊनपूर्वी बुकींगदेखील लवकर मिळत नव्हते. परंतु सध्या मागील 16 दिवसात दररोज केवळ 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे नाईलाजास्तव रेल्वे विभागाने ही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.