जीव धोक्यात घालून युवकांनी वाचवले ‘त्या’ वृद्ध महिलांचे प्राण
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महापूरात अडकलेल्या महिलांसाठी ते युवक आले धावून
प्रतिनिधी / कुरुंदवाड
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील विठ्ठल मंदिर येथे माडीवर गेल्या तीन चार दिवसापासून महापूराच्या पाण्यामुळे अडगळीत अडकून पडलेल्या व उपाशी असणाऱ्या निराधार वयोवृद्ध दोन महिलांची माहिती मिळताच आज अनेक युवकांनी सुरक्षित ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अरुण गावडे, रमेश सुतार व ग्रामपंचायत सदस्य अमोल पुजारी व गुरू पवार यांच्या पुढाकाराने नावेतून नेऊन स्थलांतरित केले. जयवंती गायकवाड (62) शांताबाई शेळके (65) असून राहण्याचे ठिकाण अवचित नगर अशी या महिलांची नावे आहेत.
कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा महापुराच्या संकटाला सर्वांना तोंड द्यावे लागले. गेल्या तीन-चार दिवसांपासून या पुराच्या पाण्याने कमालीची उंची गाठलयामुळे सुमारे 95 टक्के लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. यावेळी अवचित नगरमधील शेतमजूर निराधार असणाऱ्या महिलांनी आज ना उद्या पाणी कमी होईल या आशेवर ती विठ्ठल मंदिरच्या माडीवर गावातच कुणालाही कल्पना न देता वास्तव्य केले. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपले आहे. ही गंभीर गोष्ट काल ग्रामपंचायत येथील रहिवाशांना कळल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कल्पना दिली.
यावेळी विठ्ठल मंदिराच्या माडीवरून लोखंडी अँगल व पत्राचा आधार घेत अनेक युवकांनी सुरक्षित ठिकाणी खाली नावेत आणले. या ठिकाणी बन भागात 15 फूट पाण्याची पातळी होते. युवकांनी आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यानंतर त्या महिलांना सर्वांना आधार दिला. चहा नाश्ता देऊन त्यांना कडू मंगल कार्यालय एक किलोमीटरचा पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध प्रवास करून सुरक्षित ठिकाणी त्यांना नेऊन सोडले. सामाजिक भान जपत संकटात सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची गावची परंपरा या युवकांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
या वयोवृद्ध महिलांना वाचण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण गावडे, युवा नेते रमेश सुतार, भूषण गावडे, अमोल विभुते, गुरु पवार, आकाश गावडे, अमित सुतार, भूषण परीट, शितल परीट, रणजित मंगसूळे, प्रकाश कवाळे, निवास गावडे, सूरज जाधव गणपत परीट व प्रशांत मंगसूळे यांनी परीश्रम घेतले.