शहरातील वर्दळ झाली कमी : बाजारपेठ परिसर वगळता इतरत्र शुकशुकाट
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरामध्ये कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग, पोलीसांकडून होणारी कारवाई आणि महापालिकेकडून सुरु असलेली अँटीजेन टेस्टचा धसका शहरवासियांनी घेतला आहे. त्यामुळे रस्त्Îावरील नागरिक, वाहनधारकांची वर्दळ ही कमी झाली आहे. शहरातील बाजारपेठांचा परिसर वगळता इतरत्र मात्र शुकशुकाट असल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र मागील लॉकडाऊनच्या तुलनेत सध्या जाहीर केलेल्या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेतील घटकांचा समावेश वाढविण्यात आला आहे. संचारबंदी असूनही रस्त्यावर वाहनधारकांची गर्दी होती. त्यामुळे संचारबंदी आहे की नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत होता. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग शहरासह जिल्ह्यातही वाढत आहे.
संचारबंदी लागू केल्यापासून पोलीसही रस्त्यावर येणाऱयांची कसून चौकशी करत आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱयांवर वाहन जप्तीची कारवाई ही करण्यात येत आहे. त्याचबरोबर महापालिकेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी जावून नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा धसका शहरावासियांनी घेतला आहे. त्यामुळे संचारबंदीच्या प्रारंभी रस्त्यावर असलेल्या वर्दळीच्या तुलनेत सध्या वर्दळ कमी झाली आहे.
उपनगरात वर्दळ कायम
शहरात शुकशुकाट असला तरी उपनगरात वर्दळ कायम आहे. भाजी, किरणा खरेदीसाठी सकाळी, सायंकाळी नागरिक रस्त्यावर असतात. सकाळी भाजी मार्केटमध्येही नागरिकांची गर्दी असते. तसेच रात्री जेवण झाल्यांनतरही शतपावलीसाठी येणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उपनगरातील वर्दळ कमी करण्यासाठी येथेही प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.