– मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांची परवानगी -पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती
कोल्हापूर / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीआणि महसूलमंत्री यांनी पाच दिवसासाठी कोल्हापुर शहरातील निर्बंध हटवले आहेत. सोमवार (५ जुलै ) पासून अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी सोमवार ते शुक्रवार (५ ते ९ जुलै ) या पाच कालावधीमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळासाठी देण्यात आली आहे. तथापि पाच दिवसानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापुर शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये,सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत , असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे की, कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्ण संख्या या बाबत प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला दिलेले पत्र आणि जनभावनेचा विचार करून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी कोल्हापूर शहरातील निर्बंध आठ दिवसासाठी हटवले आहेत. असे असले तरी सर्व काही सुरू झाले आहे, असे समजून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. तसेच विनाकारण गर्दी करू नये . यामुळे जर रुग्ण संख्या वाढली तर शासनाला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागेल. आपण केलेल्या एखाद्या अनावश्यक कृतीमुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो गरजू लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये, याचा सुद्धा विचार सर्वांनी करावा. त्यामुळे सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊनच कोल्हापूर शहरातील व्यवहार सुरू ठेवावेत ,अशी विनंती पालकमंत्री पाटील यांनी केली.
विनाकारण घराबाहेर पडू नका – पालकमंत्री
शहरातील व्यावसायिक व व्यापारी संघटना, जनभावनाआणि जिल्हा प्रशासनाच्या मागणीची दखल घेऊन आम्ही केलेल्या पाठपुराव्यानुसार कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवारपर्यंत (५ ते ९ जुलै) सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. पण नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून कोरोना संसर्गाचा धोका स्वीकारू नये. या पाच दिवसात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यास पुन्हा सर्व निर्बंध पूर्ववत सुरू केले जातील.त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आस्थापना आणि उद्योजकानी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
`तरुण भारत’चे वृत्त खरे ठरले
व्यापाऱ्यांच्या मागणीवर सरकार सकारात्मक' अशा आशयाचे वृत्त फक्त
तरुण भारत’ने शनिवार, 4 जुलै रोजी प्रसिद्ध केले हेते. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने रविवारी व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे `तरुण भारत’ने दिलेले हे वृत्त खरे ठरले आहे.