जिल्हाधिकाऱयांच्या विनंतीनंतर संघटनेचा निर्णय, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभार रद्द, परिषद होईपर्यंत सर्व कारखाने बंद ठेवण्याची मागणी, ऊसदराचा निर्णय होईपर्यंत धुराडे पेटवू देणार नाही- प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील
प्रतिनिधी / कोल्हापूर:
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी होणारी 19 वी जाहीर ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानाऐवजी उदगाव येथील कल्पवृक्ष गार्डन येथे ऑनलाईन स्वरुपात होणार आहे. संघटनेच्या 50 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून दुपारी 2 वाजता सभा सुरु होईल. यामध्ये राज्यातील लाखो शेतकरी ऑनलाईन सहभागी होणार आहेत. त्यामुळे ऊस परिषदेत साखर दराबाबत निर्णय होईपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु करू देणार नाही, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वर्षांपासून जाहीर ऊस परिषदेची परंपरा आहे. त्यामुळे विक्रमसिंह मैदानावर जाहीर सभा घेण्याबाबत स्वाभिमानेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची शुक्रवारी भेट घेऊन परवानगी मागितली. पण, जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन परिषद घेण्याबाबत विनंती केली. त्यानुसार संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय झाला, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष अजित पोवार, बाळासाहेब पाटील, रंगराव पाटील, आप्पासाहेब चौगले, मिलिंद साखरपे, सचिन शिंदे, रामराव चेचर, बाजीराव देवाळकर, एम. के. नाळे, शैलेश आडके, राम शिंदे, विक्रम पाटील, अमित पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांसह जिह्यातील इतर मंत्र्यांचे कारखाने बंद करा
दरवर्षी साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि जिल्हाधिकाऱयांची बैठक घेऊन जिह्याचे पालकमंत्री ऊस दराचा तोडगा काढतात. पण यावर्षी पालकमंत्र्यांनीच आपला साखर कारखाना कोणतीही बैठक न घेता सुरु केला आहे. जिह्यातील इतर मंत्र्यांनीही कारखाने सुरु केले आहेत. त्यामुळे स्वाभिमानीच्या परिषदेपूर्वीच जिह्यात सुरु झालेले साखर कारखाने बंद करावेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडे केली.
वाहनधारकांनी ऊस वाहतूक बंद ठेवावी
ऊस परिषदेत ऊस दराचा निर्णय होईपर्यंत वाहनधारकांनी आपल्या वाहनातून ऊसाची वाहतूक करू नये. अन्यथा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या वाहनांचे नुकसान केल्यास त्यास वाहनधारकच सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशारा संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सावकार मादनाईक यांनी दिला.