नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱया पंधरवडय़ात ‘जी-20’ राष्ट्रांची परिषद सौदी अरेबियात होत आहे. तिची जंगी तयारी सौदीची राजधानी रियाध येथे सुरु आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून ‘जी-20’ राष्ट्रांचा निर्देश करणारा नकाशा प्रदर्शित करणारी नवी चलनी नोट या परिषदेचे यजमानपद सांभाळणाऱया सौदी अरेबियाने नुकतीच प्रचारात आणली. या नोटेने खळबळ उडवली असून भारतासाठी एक नवी डोकेदुखी निर्माण केली आहे.
या नोटेवर ‘जी-20’ मधील एक राष्ट्र म्हणून भारताचा निर्देश केला आहे, हे स्वाभाविक असले तरी त्या नकाशावरील सरहद्दी भारताच्या प्रत्यक्ष सरहद्दीनुसार नसल्यामुळे भारत संतप्त झाला आहे. या प्रकारासंबंधी भारताने ताबडतोब नवी दिल्लीमधील सौदी अरेबियाच्या दूतावासाकडे आपली तक्रार नोंदवली आहे. त्या देशाकडून भारताला कोणता प्रतिसाद मिळतो, ते अद्याप कळले नाही. तूर्त त्या नोटेवर भारताच्या चुकीच्या सरहद्दी दाखवणारा नकाशा व दुसऱया बाजूला सौदीचे राजे सलमान यांची छबी व ‘जी-20’ देशांच्या परिषदेचे बोधचिन्ह झळकत आहे. एखाद्या देशाने भारताच्या चुकीच्या सरहद्दी दाखवणारे नकाशे प्रदर्शित करणे, ही काही प्रथमच घडलेली गोष्ट नाही. हा खोडसाळपणा चीनने तर कित्येकदा केला आहे. अरुणाचल हा आपलाच भाग आहे, असे दाखवणारे नकाशे चीनने यापूर्वीच प्रकाशित केले असून अक्साई चीनही अलीकडे चीनच्याच नकाशात दाखवण्यात आला आहे. अर्थात याबाबत भारताने वेळोवेळी स्पष्ट शब्दात आपली हरकत नोंदवली.
चीन आणि भारत दरम्यान असणाऱया सरहद्दीबाबत अनेक वर्षापासून विवाद आहे. भारताची उत्तरेकडील सीमा मध्येच नेपाळचा पट्टा पसरलेला असल्यामुळे पूर्वेस अरुणाचल प्रदेश व पश्चिमेस जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भूभागांमध्ये चीनला स्पर्श करते. हे तिन्ही भाग निर्विवादपणे भारताच्या सार्वभौमत्वाखाली असले तरी भारत-चीन युद्धानंतर त्यातील प्रचंड क्षेत्रावर चीन आपला दावा सांगत आला आहे. या क्षेत्रापैकी पूर्वेकडील 90 हजार चौ.कि.मी. प्रदेश म्हणजे जवळजवळ सगळेच अरुणाचल प्रदेश राज्य ‘आमचे’ आहे, असे चीनचे म्हणणे आहे. हा प्रदेश भारताचा आहे आणि भारताचेच त्यावर प्रशासन आहे. दुसऱया बाजूने पश्चिम सरहद्दीवरील काश्मीरचा 38 हजार चौ. कि.मी. भूप्रदेश भारताचा असला तरी तेथे सध्या चीनचे प्रशासन आहे. ‘अक्साई चीन’ म्हणतात तो हाच! याखेरीज पश्चिम सरहद्दीवर आणखी 2 ठिकाणीही वादग्रस्त परिसर आहे. भारताची उत्तरेकडील सरहद्द स्वातंत्र्यापासूनच अशा प्रकारच्या वादात सापडली आहे. जम्मू काश्मीर (आता काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश) हे राज्य देखील अर्धे पाकव्याप्त आहे. या पार्श्वभूमीवर चीनने एका प्रसंगी प्रदर्शित केलेला भारताचा नकाशा मात्र भारताला मान्य असणाऱया सरहद्दीचा होता, हे विशेष. गेल्यावर्षी एप्रिल 2019 मध्ये चीनने ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’ नावाची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. त्यावेळी आशिया व युरोप हा पृथ्वीतलावरील सलग विस्तीर्ण भूप्रदेश असणारा कित्येक राष्ट्रांचा भाग रस्ते आणि रेल्वे मार्गाने विनाखंड जोडण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी महायोजनेची माहिती चीनने सर्व देशांना दिली. त्या प्रसंगी या प्रदेशाचा जो नकाशा प्रदर्शित केला, त्यात भारताची सरहद्द योग्यरितीने दाखवली होती, अशी माहिती भारतातील एका लोकप्रिय इंग्रजी नियतकालिकातील लेखाद्वारे प्रसिद्ध झाली होती. याचा सरळ अर्थ असा की, भारताची खरी सरहद्द चीनला चांगली ठाऊक आहे आणि मान्यही आहे. ठाऊक नसती तर तो नकाशा दाखवताना चूक झाली असती आणि ज्याअर्थी भारतमान्य सरहद्दीचे मानचित्र इतक्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर प्रदर्शित केले, त्या अर्थी चीनने ते मान्यच केले आहे, असा अर्थ काढणे गैर ठरणार नाही. ही बाब चीन आणि भारतासंदर्भात होण्याचे कारण अर्थातच 1962 सालच्या युद्धाशी बऱयाच अंशी संबंधित आहे. परंतु पूर्णतः ते कारण नाही. भारतावर ब्रिटिशांचा अंमल असतानाच ही सीमानिश्चिती झाली. त्यावेळी नकाशावर आखलेली ‘मॅकमोहन रेषा’ चीनने त्यावेळी स्वाक्षरी केली असली तरी आज ते राष्ट्र अमान्य करत आहे. हा आणखी व्यापक चर्चेचा विषय आहे. सौदी अरेबियाने प्रकाशित केलेल्या नकाशात भारताची सरहद्द चुकीची दाखवली आहे, याचा अर्थ पाकव्याप्त काश्मीर हा प्रदेश भारताच्या सरहद्दीच्या बाहेर दाखवला आहे, असे करण्याचे कारण काय, याचे उत्तर खोडसाळपणा असेच द्यावे लागेल. सौदीचे राजे बहुचर्चित सलमान हे भारताचे मित्र आहेत, असे आपल्याकडील अनेकांना वाटते. गेल्या वर्षी 370 वे कलम निष्प्रभ करण्यात आले तेव्हा जे वादळ उठले, त्यावेळी पाकव्याप्त काश्मीर हा प्रदेश पाकिस्तानच्या ताब्यात आहे, तो सार्वभौमत्वाच्या दृष्टीने पाकिस्तानचा भाग नाही, हे स्पष्ट झाले होते आणि म्हणूनच एरव्ही खंबीरपणे पाकच्या पाठीशी उभा राहणारा चीन, सुरक्षेच्या नावाखाली पाकवर डॉलरचा पाऊस पाडणारी अमेरिका आणि ‘आपल्या धर्माचे लोक’ अशी पाकची समजूत असणारी यच्चयावत अरब राष्ट्रे आपण यात पडणार नाही, अशी भूमिका घेऊन बाजूला झाली. आता अवघ्या सव्वा वर्षात सौदीला या साऱयाचा विसर पडला आणि पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या सरहद्दीबाहेर दिसणारा जगाचा नकाशा त्याने ‘खरा’ मानून नव्या नोटेवर छापला.
आता दुसऱया प्रश्नाचा विचार. हा नकाशा सौदीने आणला कुठून? ‘ऑक्सफर्ड’ हे जगातील एक नामवंत आणि प्रतिष्ठित प्रकाशन मानले जाते. त्याने प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक ऍटलासमध्ये भारताच्या सरहद्दी अशाच पाकव्याप्त काश्मीरच्या बाहेर दाखवलेल्या असतात. ज्या ज्या पानांवर भारताचे आणि भारतासह आशिया, जग यांचे नकाशे छापलेले असतात त्या त्या पानांवर ‘या नकाशात दाखवलेल्या भारताच्या सीमा मानकाबरहुकूम नाही’ असा गुळमुळीत मजकूर छापलेला एक लहानसा स्टिकर चिकटवलेला असतो. तो सुद्धा भारतातील ज्या ग्रंथालयांमध्ये व विक्रेत्यांकडे हे ऍटलास असतात तिथेच. एरव्ही संपूर्ण जगभरात ‘ऑक्सफर्ड’चे ऍटलास तशाच चुकीच्या नकाशांवर विकले जातात आणि भारताखेरीज अन्य देशांत असला स्टिकर लावला जात नाही. गेल्या सत्तर वर्षात हे नकाशे छापलेली पुस्तके उचला आणि नष्ट करून योग्य ती सरहद्द आणि पाकव्याप्त काश्मीर असा निर्देश केलेले नकाशे छापून आणा, असे ठणकावून सांगण्याचे काम कोणत्याही सरकारने केले नाही. म्हणून मैत्री कराराला जेमतेम एक वर्ष झाले असताना भारताच्या परममित्रांपैकी एक सौदी अरेबिया असा विपरीत नकाशा छापण्यास धजला.
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601