भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पवित्रा, राज्य स्तरावर मात्र खेळाडूंना सराव करण्याची मुभा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लॉकडाऊन 4.0 मध्ये क्रीडा संकुल व स्टेडियम्स उघडण्याची मुभा देण्यात आली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटपटूंसाठी तातडीने सराव शिबिर आयोजित करण्याची घाई करणार नाही, असे सोमवारी स्पष्ट झाले. नियामक मंडळ राष्ट्रीय स्तरावर मध्यवर्ती खेळाडूंना एकत्रित बोलावण्याऐवजी त्यांना आपापल्या राज्यातील मुख्य स्टेडियम्समध्ये सराव करता येईल, अशी मंडळाची योजना आहे.
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने रविवारी जे दिशानिर्देश जारी केले, त्यानुसार, स्टेडियम्स खुले करता येतील. पण, दि. 31 मे पर्यंत लॉकडाऊन असेतोवर प्रेक्षकांना त्यात प्रवेश देता येणार नाही. याचाच अर्थ खेळाडूंना वैयक्तिक सराव सुरु करता येईल.
‘31 मे पर्यंत हवाई वाहतूक व नागरिकांच्या रहदारीवर बंधने असतील. ते लक्षात घेता बीसीसीआय आणखी प्रतीक्षा करणे पसंत करेल. यादरम्यान मध्यवर्ती करारबद्ध खेळाडू कौशल्य-आधारित प्रशिक्षणावर भर देतील’, असे बीसीसीआय खजिनदार अरुण धुमल यांनी पत्रकातून नमूद केले. बीसीसीआयचे पदाधिकारी राज्य संघटना, संघव्यवस्थापनाच्या संपर्कात असतील आणि परिस्थितीत आणखी सुधारणा झाल्यानंतर पूर्ण संघासाठी नवी रुपरेषा आखतील, असेही धुमल पुढे म्हणाले. खेळाडू, प्रशिक्षण पथक व संलग्न घटकातील प्रत्येक सदस्याची सुरक्षितता हा आपला सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल, याचा त्यांनी येथे विशेष उल्लेख केला.
कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे देशात 3 हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर 95 हजारपेक्षा अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जागतिक स्तरावर तर या प्रकोपामुळे 3.15 लाखापेक्षा अधिक जणांचे बळी गेले आहेत तर 47 लाखापेक्षा अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.