निरीक्षक पी. चिदंबरम यांचे उद्गार
प्रतिनिधी/ काणकोण
क्रियाशील कार्यकर्ते ही पक्षाची शक्ती असून या कार्यकर्त्यांच्या बळावर आणि श्रामवर जिंकून आलेल्या आमदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष गहाण ठेवला. ही अत्यंत शरमेची गोष्ट असून यापुढे कार्यकर्ते ज्या नावाची शिफारस करतील त्याच व्यक्तीला काणकोण मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल. त्याचबरोबर पक्षाविषयी प्रामाणिकपणा, अखंडता, मतदारांमध्ये असलेली स्वीकृती आणि जिंकून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवाराची निवड केली जाईल. काणकोण गट काँग्रेसने आतापर्यंत 330 क्रियाशील कार्यकर्त्यांची नोंदणी केली आहे. हेच कार्यकर्ते काणकोणचा उमेदवार ठरवतील, असे अखिल भारतीय काँग्रेसचे गोव्यासाठीचे निरीक्षक पी. चिदंबरम यांनी काणकोणच्ग्नया काँग्रेस कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.
राजबाग येथील हॉटेल मॉलिमामध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याच्या व्यासपीठावर गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, पक्षाध्यक्ष गिरीश चोडणकर, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, ज्यो डिसोझा, एम. के. शेख, प्रकाश राठोड, सुभाष फळदेसाई, महादेव देसाई, दया पागी, अजय पागी, प्रलय भगत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित हाते.
कठीण परिश्रमांची तयारी ठेवा
पक्षाची प्रतिष्ठा वाढविणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असून येणाऱया काळात संघटितपणे काम करताना मतदारांच्या दारापर्यंत पक्षाची ध्येय-धोरणे पोहोचविणे, जनतेच्या समस्या समजून घेणे आणि कठीण परिश्रम करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवायला हवी. पक्षाचा नवा जाहीरनामा तयार करताना नवीन योजना आणल्या जातील. त्यात सर्व घटकांचा विचार केला जाईल. तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष आतापर्यंत सदोदित काम करत आलेला आहे, असे चिदंबरम यांनी सांगितले. मागच्या वेळी ज्या चुका झाल्या त्या परत न करता आपला उमेदवार ठरविण्याचा हक्क आपल्यालाच दिला जाईल, असे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
जनता समस्यांनी त्रस्त ः कामत
बेकारी, महागाई आणि आर्थिक टंचाईने गोव्याची जनता त्रस्त झालेली आहे. गोव्याचे प्रशासन खराब झालेले आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाला जनतेने विरोधी बाकावर बसविले होते. परंतु पैशांसाठी आणि सत्तेसाठी आमदार विकले गेले, असा आरोप दिगंबर कामत यांनी केला. 2009 साली काणकोणात आलेल्या महापुराच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. आपण घरी दिवाळी साजरी न करता आपल्या पत्नीसहित काणकोण तालुक्यातील लोकांच्या मदतीसाठी या ठिकाणी ठाण मांडून राहिलो. तर भाजप सरकारात कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा पुरवठा न केल्यामुळे कित्येक लोकांचे बळी गेले. हे सरकार प्रशासन घेऊन लोकांच्या दारात येत आहे, तर लोक मात्र इस्पितळांत जात आहेत. 2007 ते 2012 या काळात गोव्याचे सरकार समृद्ध होते, तर 2012 ते 2021 या काळात सरकार गरीब झाले, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसची मते विभागण्यासाठी अन्य पक्षांचा प्रवेश ः राव
या ठिकाणी दूरदृष्टी असलेल्या मुख्यमंत्र्यांची गरज असून येथील लोकांनी नाकारलेला पक्ष आज सत्ता उपभोगत आहे. काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्यासाठी या ठिकाणी अन्य पक्ष प्रवेश करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे, असा सल्ला दिनेश राव यांनी दिला. गोमंतकीयांना विश्रांतीची गरज असून सर्वांनी संघटितपणे काम केल्यास या सर्व गोष्टी शक्य आहेत, असे मत आमदार लॉरेन्स यांनी व्यक्त केले. काँग्रेस सर्वधर्मियांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून महागाईवर नियंत्रण ठेवून वाढलेले दर कमी करण्याचा प्रयत्न भाजपाने करावा. प्रत्येकाने मतदार म्हणून नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून काम करावे. काँग्रेसने गोव्याला मुक्ती दिली. ओपिनियन पोल आणला. घटकराज्याचा दर्जा दिला आणि कोकणी ही गोव्याची राजभाषा बनविली याची आठवण खासदार सार्दिन यांनी करून दिली.
या मेळाव्यास काणकोणच्या विविध भागांतून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी काँग्रेसचे सचिव महादेव देसाई, जनार्दन भंडारी, लेविन ग्रासियस, उदय गावकर, क्विन्सी फर्नांडिस, अजय पागी यांनी काणकोणला भेडसावणाऱया सीआरझेड, कुमेरी, पाणी, वीज, रस्ता, बेकारी यासारख्या अनेक समस्या मांडल्या. काणकोण मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी अथक परिश्रम केले जातील त्याचबरोबर विजय काँग्रेसचाच होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दया पागी यांनी आभार मानले.