कणकवली – वागदे येथील प्रकार : गांभीर्य ओळखा – डॉ. मडव
दिगंबर वालावलकर / कणकवली:
जिह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींना गणेशोत्सव कालावधीत सात किंवा चौदा दिवस क्वारंटाईन करायचे, याबाबत मतमतांतरे आहेत. मात्र, 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतरही कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार वागदे येथे समोर आला आहे. मुंबईहून आलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने त्यांनी दिलेल्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आरसीएमआर’च्या मार्गदर्शन तत्वांनुसारच क्वारंटाईन कालावधी पाळला जाण्याची नितांत गरज असल्याचे मत डॉ. मडव यांनी व्यक्त केले आहे.
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱया चाकरमान्यांना सात किंवा दहा दिवस क्वारंटाईन करून त्यांना गणेशोत्सवासाठी घरात पाठविण्याची मागणी गेले काही दिवस पुढे येत आहे. या मागणीला वैद्यकीयदृष्टय़ा आधार नसल्याने कदाचित असा निर्णय घेतला, तर तो कसा धोकादायक ठरू शकतो, याचे उदाहरण नुकतेच कणकवली तालुक्यात वागदे येथे समोर आले आहे.
पेड क्वारंटाईनचा पर्याय निवडला!
बोरिवलीतून एक ज्येष्ठ व्यक्ती वागदे येथे 11 जुलैला आपल्या पत्नीसह गावी आली. गावातील घरात कुटुंबातील अन्य व्यक्ती असल्याने त्यांनी पेड क्वारंटाईनचा पर्याय स्वीकारत 11 ते 24 जुलैपर्यंत गावातीलच लॉजिंगवर क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला. त्यानंतर ते पत्नीसोबत 25 जुलैला आपल्या घरी गेले. 14 दिवसात कोणताही त्रास जाणवला नसल्याचे व कोरोनाच्या आजारापासून दूर राहिल्याचे समाधानही त्यांना होते.
अचानक त्रास जाणवू लागला!
क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून घरी गेल्यानंतर त्या वृद्धाला त्रास जाणवू लागल्याने ते उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेले होते. मात्र, तेथे त्यांची ट्रव्हल्स हिस्ट्री विचारून घेत त्यांना स्वॅब तपासणीचा सल्ला देण्यात आला. 26 जुलैला कणकवलीतील स्वॅब कलेक्शन केंद्रावर दिलेल्या स्वॅबचा अहवाल 27 जुलैला पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेलेल्या रिक्षा चालकासह त्या ज्येष्ठांच्या कुटुंबियांना हायरिस्कमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याचे वागदे ग्रामसनियंत्रण समिती अध्यक्ष सरपंच पूजा घाडीगावकर यांनी सांगितले.
‘आयसीएमआर’च्या सूचना पाळायलाच हव्यात!
जिह्यात गेले काही दिवस अनेक सरपंच, राजकीय नेत्यांकडून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना सात दिवसांचे क्वारंटाईन करण्याची मागणी पुढे येत आहे. मात्र, वागदेतील ही घटना पाहता सात दिवसांचे क्वारंटाईन हे किती धोकादायक ठरू शकते, त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसारच क्वारंटाईन कालावधी येत्या काळात पाळला न गेल्यास त्याचा फटका जिह्यात मोठय़ा प्रमाणात बसू शकतो.
रिस्क कशी घेऊ शकतो?
याबाबत डॉ. प्रशांत मडव म्हणाले, जिह्यात काही ठिकाणी सात ते दहा दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीची मागणी पुढे येत आहे. मात्र, वागदेतील ही घटना पाहता चौदाव्या दिवसानंतर एखाद्या व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येत असेल, तर आयसीएमआरची मार्गदर्शन तत्वे आपण कशी बदलणार? आपण अशी रिस्क कशी घेऊ शकतो? आताच्या मागणीप्रमाणे सात ते दहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करण्यात आला, तर ती व्यक्ती क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर जर ताप आला तर व्हायरल फिव्हर आहे, असे समजून अनेक ठिकाणी फिरू शकते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात समूह संसर्गाला निमंत्रण मिळू शकते.
क्वारंटाईन कालावधी 28 दिवसांचा!
जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कोविड टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. यात शासकीय डॉक्टरांसह जिल्हय़ातील काही खासगी डॉक्टर आहेत. या टास्क फोर्समधील सदस्यांनीही 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. एयसीएमआरच्या सूचनांनुसार क्वारंटाईन कालावधी हा एकूण 28 दिवसांचा आहे. यातील 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन व 14 दिवस होम क्वारंटाईन अशी तरतूद आहे. पण आपण आपल्या सोईच्या दृष्टीने 14 दिवसांवर अधिक लक्ष केंद्रीत करताना उर्वरित 14 दिवसांकडे दुर्लक्ष करू नये, असे मत डॉ. मडव यांनी व्यक्त केले आहे.