वार्ताहर/ किणये
क्वारंटाईन विभागातील संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी मंडाळी येथील मुरारजी देसाई शाळेत खाट आणून ठेवण्यात आल्यामुळे मंडोळी गावात गुरुवारी एकच खळबळ उडाली होती. आमच्या गावात क्वारंटाईनचे रुग्ण नको. ही व्यवस्थाच नको, असा विरोध नागरिकांनी केला.
गावाजवळ असलेल्या शाळेत क्वारंटाईन विभाग सुरू केल्यास याचा ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल. याची चिंता गावात पसरल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी गावचे सर्व रस्ते बंद केले.
मोरारजी देसाई शाळेत क्वारंटाईन विभागातील रुग्णांना ठेवण्यासाठी आरोग्य खाते व प्रशासनाच्यावतीने खाट आणून ठेवल्याची माहिती गावात वाऱयासारखी पसरताच ग्रामस्थांमधून तीव्र विरोध झाला.
मंडोळीकडे जाणारा मुख्य रस्ता, मंडोळी-सावगाव रस्ता व मंडोळी-नावगे संपर्क रस्त्यांवर झाडांच्या फांद्या, दगड ठेवून रस्ते बंद करून प्रवेश बंद करण्यात आला.
गावात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी ता. पं. चे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन, तहसीलदार कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी दाखल झाले होते. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष मारुती दळवी, पीडीओ, ग्रा. पं. सदस्य व काही नागरिक उपस्थित होते.
महिलांचही विरोध
आमच्या गावाजवळ अशी क्वारंटाईनची व्यवस्था नको, असे म्हणत महिलांनी मोठय़ा प्रमाणात आपला विरोध दर्शविला. बेळगाव तहसीलदार व आलेल्या अधिकाऱयांनी याठिकाणी रुग्ण ठेवण्यात येणार नाहीत. सरकारच्या आदेशानुसार राखीव जागेची सोय करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे, असे सांगितले. व ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.
आज देणार निवेदन
कोणत्या परिस्थितीत गावात ही व्यवस्था नकोच, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. शुक्रवारी सकाळी ग्रा. पं. पीडीओंना ग्रामस्थांच्या सहीनिशी विरोध म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.