वार्ताहर / गोकुळ शिरगाव
उजळाईवाडी येथील कोल्हापूर विमानतळावर आज दाट धुके, खराब हवामानामुळे सर्व विमानांचे लँडिंग व टेक ऑफ रद्द करण्यात आली. अलायन्स एअरलाइन्सचे हैदराबाद होऊन आलेले विमान आज साडेबारा ऐवजी अर्धा तास उशिरा म्हणजे एक वाजता आले. परंतु अलायन्स एअरच्या वैमानिकास ढगाळ वातावरणामुळे धावपट्टी दिसत नव्हती, त्यामुळे सदर विमान थोड्यावेळ घिरट्या घालून परत माघारी गेले. त्यानंतर इंडिगोचे दुपारी दीड वाजता आलेले विमानही खराब हवामानामुळे माघारी फिरले.
दिवसभर धुसर वातावरण कायम राहिल्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून होणारी हैदराबाद, बेंगलोर ही विमाने रद्द करण्यात आली. तर निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे मुंबई विमानसेवा फक्त मंगळवार बुधवार गुरुवारीच सुरु असते. असे माहिती विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी कमल कुमार कटारिया यांनी दिली. उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे आज हाल झाले. बराच वेळ तिष्ठत बसलेल्या प्रवाशांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.