महिला दिनाचे वारे सर्वत्र वाहू लागलेले आहेत . ठिकठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम , स्पर्धा , गौरव पुरस्कार सोहळे सुरु आहेत . स्त्री विकास आणि स्त्री स्वातंत्र्यासाठी स्त्रिया आज जास्त जागरूकतेने कार्यरत असताना दिसताहेत. पण काल ‘देवी ’ ही शॉर्टफिल्म पाहिली आणि विचार आला, आज खरंच सगळय़ा स्तरातील स्त्रिया सुरक्षित आहेत का ? अगदी उच्चभ्रु समाजापासून तळागाळापर्यंत स्त्रियांवर होणारे अन्याय मग ते घरगुती असोत किंवा सामाजिक… याला वाचा कशी फुटणार ? कोण आहे याला जबाबदार ? अशा अन्यायापासून , गुन्ह्यापासून आपल्या आया -बहिणींना , मुलींना वाचवण्यासाठी काय पावले उचलणे गरजेचे आहे याचा गंभीरतेने विचार करणे आज काळाची गरज ठरत आहे .
आधीच्या काळात लहान मुलांना शुभंकरोती, रामरक्षा, मारुती स्तोत्र यासारखे संस्कारात्मक श्लोक रोज सकाळ, संध्याकाळ आया – आज्यांकडून शिकायला मिळायचे, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणजे संपूर्ण आयुष्य जगण्याची पुंजी , शिवाय रामाच्या, मारुतीच्या, शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकूनच कितीतरी बालके प्रेरित व्हायची. आपल्या उदात्त संस्कृतीची ओळख आणि पारख त्यांना कोवळय़ा वयातच व्हायची, जेणेकरून एक सुसंस्कारित बीज अंकुरायला मदत व्हायची. पण आज चित्र बदललेले आहे. आजची स्त्री शिक्षणाने सुशिक्षित झालीये, आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झालीये पण आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी कोणत्यातरी संस्कारवर्गाची गरज तिला भासतीये. जिथे आठवडय़ातून एकदा – दोनदा अर्ध्यातासासाठी हे संस्कारात्मक श्लोक म्हणून घेतले जातात, ते कितपत मुलाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतात हा वेगळा विषय आहे . कितीतरी मुलांना आईला निवांत वेळ मिळावा म्हणूनही अशा क्लास्सेसना पाठवले जाते. मग राहिलेले आठवडय़ातले 5 दिवस टी . व्ही , मोबाईल्सच्या जोखडात ही मुले अडकलेली दिसतात. आणि अशा सोशिअल मीडियावर येणाऱया जाहिराती किंवा व्हिडिओजवर बऱयाच वेळा पालकांचे नियंत्रण असू शकत नाही.
आज आपण सर्वेक्षण केले तर कळेल किती लहान मुलांना आज रामरक्षा, मारुती स्तोत्राचा अर्थ माहिती आहे ? किंबहुना किती मुलांना ते येतं? किंवा असं काही असतं म्हणून माहितीये. मुलांना आज छत्रपती शिवाजी महाराज थोर राजे होऊन गेले म्हणून सांगितले जाते पण किती मुलांना आज त्यांच्या शौर्याची गाथा माहिती आहे ? दुर्दैवाने अगदी बोटावर मोजण्या इतपतच. आजच्या मुलांवर सिनेकलाकारांचा, पाश्चात्य संस्कृतीचा इतका जबरदस्त पगडा आहे ना कि त्यांना कितीतरी आपल्या साधू संतांची, स्वातंत्र्य सैनिकांची नावेही माहिती नाहीत, त्यांचे प्रेरणात्मक चरित्र तर लांबची गोष्ट आहे. मग, अशा अस्कळीत, विस्कळीत संस्कारांचे खतपाणी घेऊन फुटणाऱया अंकुराला कीड ही लागणारच, त्यात नवल काय आहे ?
या सर्वांसाठी जबाबदार कोण आहे ? ‘आपण स्त्रियाच’ असं माझं एक स्त्री म्हणून प्रांजळ मत आहे . आज जसं आपण आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी दिवसरात्र कार्यरत आहोत, तसंच आपल्या पुढच्या पिढीला विचारांनी सुसंस्कृत बनवण्याची जबाबदारी आपण स्त्रियांचीच आहे . कारण म्हटलंच जातं, आई ही मुलाची पहिली मैत्रीण असते, कारण ती मुलाला 9 महिने तिच्या उदरात वाढवते, जपते, जन्म देते आणि मग त्या बालकाच्या संगोपनामध्ये आईचाच सिंहाचा वाटा असतो. अशा वेळी आपण आई म्हणून आणि एक स्त्री म्हणून समाजातील एक महत्वपूर्ण भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर असते.
आज आपण स्त्रिया इतक्मया निर्भीडपणे महिला दिन साजरे करूच शकलो नसतो जर स्वराज्यनिर्मात्या राणी जिजाऊ नसत्या, राणी लक्ष्मीबाई नसत्या, अहिल्याबाई होळकर नसत्या अशा अनेक कणखर, खंबीर स्त्रियांनी दाखवलेल्या शौर्यामुळे आणि त्यागामुळे आज आपण समाजात ताठ मानेने वावरू शकतो. त्यांच्या तुलनेत आपली वाटचाल खूपच सोपी आहे . त्यावेळी तर परकियांना मात द्यावी लागायची, आता मात्र आपल्यातील हैवानी विचारांवर मात करण्याची गरज आहे . आणि ती सुरु होते, प्रत्येक आईपासून, ती देत असलेल्या संस्कारांपासून . जर लहानपणापासूनच प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिवाजी महाराजांचे शौर्य, आपल्या लोकांप्रती प्रेम, आत्मीयता , स्त्रीप्रति आदर शिकवला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे “परस्त्री मातेसमान “ असे धडे गिरवले तर किती तरी स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे कमी व्हायला मदत होईल .
त्यामुळे मैत्रिणींनो, आज महिला दिनी आपण आपल्या स्वतःच्या विकासाबरोबरच आपल्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि सुसंस्कारांसाठी एक मोठी ढाल बनून खऱया अर्थाने राजमाता जिजाऊंसारख्या असंख्य वीर स्त्रियांना श्रद्धांजली वाहूया!!!
– डॉ. स्नेहल अवधूत सुखठणकर