अटक व सुटका : मोठा मोर्चा आणण्याचा इशारा
प्रतिनिधी / पणजी
विविध राष्ट्रांमध्ये जहाजावर कामास गेलेल्या आणि कोविड-19मुळे अडकून पडलेल्या सुमारे आठ हजार गोमंतकीयांना परत गोव्यात आणण्याच्या मागणीसाठी त्यातील काही व्यक्तींच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर उपोषणास प्रारंभ केला असता त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून नंतर सोडून दिले. नातेवाईकांनी यानंतर इतर सर्व जनतेला एकत्र करून मोठा मोर्चा आणण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील असंख्य व्यक्ती विविध राष्ट्रांमध्ये जहाजावर खलाशी व इतर कामे करण्यासाठी गेले असता संपूर्ण जगभर कोविड-19चा प्रसार फैलावल्याने प्रत्येक राष्ट्राने आपापल्या सीमा सील केल्या व लॉकडाऊन सुरू केल्यानंतर बहुतेक खलाशी हे जहाजांवरच अडकलेले आहेत. त्यातील काहीजण हे कोविड-19 बाधितही आहेत. जहाजावर असल्याने ते ज्या देशात राहात होते, त्या ठिकाणी देखील जाणे त्यांना अशक्य झाले आहे. संकटात सापडलेली ही सर्व मंडळी अद्याप एक महिना झाला तरी जहाजावरच असल्याने त्यांना पुन्हा गोव्यात आणा, या मागणीसाठी जोर धरला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने एका याचिका प्रश्नी ज्या देशात जे लोक आहेत, त्यांना सध्या त्याच ठिकाणी राहू द्या, असा आदेश अलीकडेच दिल्याने भारत सरकारने विषय गांभीर्याने घेतलेला नाही.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशीदेखील चर्चा केलेली आहे.मात्र त्यांनी सध्याच्या परिस्थितीत त्यांना आणणे अशक्य असल्याचे कळविले. तर बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडे या संदर्भात चर्चा करून गोमंतकीयांना गोव्यात आणण्यासाठी दबाव सुरू केला आहे. एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.
गोवा सरकारने प्रयत्न केले असले तरी जहाजांवर गेलेले गोमंतकीय हे विविध राष्ट्रांमध्ये विखुरलेले आहेत. त्यांना एकत्र आणायचे कसे? अनेक राष्ट्रांमध्ये विमानसेवा बंद पडलेली आहे. त्यामुळे या लोकांना गोव्यात आणता येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ज्या सात ते आठ नातेवाईकांनी उपोषण सुरू केले, त्यांनी हातात फलक घेतले होते. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन पणजी पोलीस स्थानकावर आणले. त्यांना तिथे अटक करून सोडून दिले.
तर मोठय़ा संख्येने पणजीत येऊ
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना या नातेवाईकांनी सांगितले की, गोवा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे उपोषण केले होते. जर गोवा सरकारने मागणी मान्य केली नाही तर आम्ही मोठय़ा संख्येने पणजीत येऊ. त्यावेळी किती पोलीस आम्हाला अटक करून आत टाकतात, ते पाहू. गोमंतकीय जे बाहेर बोटीवर आहेत, त्यांना आणण्यासाठी गोवा सरकारने त्वरित प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.