प्रतिनिधी / पणजी :
मागील आठ वर्षांपासून खाण अवलंबित आर्थिक लॉकडाऊनला सामोरे जात आहेत. खाणपट्टय़ातील पंचायतीची तसेच नागरिकांची अवस्था बिकट आहे. आर्थिक व मानसिक अशा दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील खाणव्यवसाय लवकरात लवकर सुरू करावा तसेच राज्यपालांनीही यात हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे. तसेच खाणव्यवसाय सुरू करण्याबाबत राज्यपालही सकारात्मक आहेत अशी माहिती खाणपट्टय़ातील 26 पंचायतीचे वकील ऍड. अमेय काकोडकर यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट
राज्यातील खाणपट्टय़ातील 26 ग्रामपंचायतीतील काही ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी ऍड. अमेय काकोडकर यांच्यासमवेत राज्यपाल सत्यपाल मलिक यांची दुपारी राजभवनवर भेट घेतली. या भेटीत खाण अवलंबित ज्या समस्यांना सामोरे जात आहेत त्याविषयी सविस्तर चर्चा केली आणि राज्यात खाण व्यवसाय सुरू करण्यात यावा यासाठी केंद्र सरकारकडे विनंती करावी अशी मागणी केली.
खाणव्यवसायाबाबत सर्वोच्च न्यायालयात 18 रोजी सुनावणी
गोव्यातील 26 ग्रामपंचायतींनी खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात याविषयी दि. 18 रोजी सुनावणी होणार आहे. ही 26 गावे खाण उद्योगावर अवलंबून आहेत. खाण व्यवसाय लोकांचा मुख्य आधार असून येथील रहिवासी किमान 6 पिढय़ांपासून खाण क्षेत्रात कार्यरत आहेत. या गावातील बहुतांश लोक बेरोजगार झाले आहेत. मागील कित्येक वर्षे खाण व्यवसायात असल्यामुळे आणि त्यात रूळल्यामुळे इतर ठिकाणी नोकरी मिळणे कठीण आहे. खाण व्यवसाय सुरू नसल्यामुळे अनेकजण मानसिकरित्या ढासळले आहेत. यामुळे अनेक घरात घरगुती हिंसाचारही होत आहेत. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे नैराश्येचे फळ घरगुती हिंसाचारातून निघत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू करावा असे ऍड. काकोडकर यांनी सांगितले.
खाणपट्टय़ात मागील आठ वर्षांपासून आर्थिक लॉकडाऊन
खाणपट्टय़ातील लोक खाण व्यवसाय बंद असल्यामुळे मागील 8 वर्षांपासून त्रस्त आहेत. या भागातील 90 टक्के लोक हे खाण व्यवसायावर अवलंबून आहेत. मागील आठ वर्षे आम्ही आर्थिक लॉकडाऊनला सामोरे जात आहोत असे सावर्डेचे सरपंच संदीप प्रभूपाऊस्कर म्हणाले.