आमदार सुदिन ढवळीकर यांची घोषणा
प्रतिनिधी / फोंडा
खाण अवलंबितांनी येत्या 8 फेब्रुवारी रोजी राजधानी पणजीत होणाऱया मूक मोर्चाला मगो पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून पक्ष कार्यकर्ते त्यात सहभागी होणार असल्याची माहिती मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली. राज्य सरकारला खाण अवलंबितांचे काहीच पडून गेलेले नाही. राज्यातील खाणी सुरु करण्यापेक्षा त्यांना कोळसा वाहतूक अधिक महत्त्वाची वाटते, असा आरोप बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केला.
सरकारला खाणींपेक्षा कोळसा महत्त्वाचा वाटतो
यावेळी बांदोडय़ाचे सरपंच राजेश नाईक व कवळेचे सरपंच राजेश कवळेकर हे उपस्थित होते. राज्यातील खाणी पूर्ण ताकदीने सुरु झाल्याशिवाय खाण अवलंबितांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार नाही. राज्याच्या महसुलाचा प्रमुख स्रोत असलेल्या खाणींकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. गोव्यासाठी आर्थिक दृष्टय़ा खाणींचे महत्त्व मगोसारखा प्रादेशिक पक्षच जाणू शकतो, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. राज्यातील 3 लाखाहून अधिक लोकांचे भवितव्य खाण व्यवसायावर अवलंबून असताना भाजपा सरकारला राज्यात कोळसा अधिक महत्त्वाचा वाटतो. राज्यात 24.5 मिलियन टन कोळसा हाताळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रेल्वे दुपदरीकरण हे कोळसा वाहतुकीसाठीच होत असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
भाजपा सरकारने म्हादई कर्नाटकला विकली
म्हादईच्या प्रश्नावर बोलताना राज्यातील भाजपा सरकारने म्हादई कर्नाटकला विकून टाकल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकने म्हादईचे पाणी व्यवस्थितपणे साठवून मलप्रभेत सोडण्याची तयारी केलेली आहे. तसे झाल्यास राज्यातील किमान सहा तालुक्यांना त्याचा फटका बसणार आहे. ओपा पाणी प्रकल्पावरही गंभीर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मगो पक्षाच्या सत्ताकाळात माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर व त्यानंतर सत्तेवर आलेल्या पुलोआ सरकारने म्हादईचा मुद्दय़ावर कधीच तडजोड केली नव्हती. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकाराने म्हादईबाबत कुठलेही गांभीर्य दाखविले नाही. शेळ मेळावली येथील आयआयटी प्रकल्प विरोधातील आंदोलनाला मगो पक्षाने पाठिंबा दिला होता, असे सांगून विधानसभेत मेळावली वासियांच्या अभिनंदनाचा ठराव आपण स्वतः प्रश्नसूचिमध्ये दिला होता. तो दडपून टाकल्याचा आरोपही सुदिन ढवळीकर यांनी केला.