प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात जिल्हा पंचायत योजनेंतर्गत विविध खात्याकडून हाती घेण्यात येणाऱया विकासकामाला तातडीने अनुदान उपलब्ध करुन देवू, असे आश्वासन जि. पं. अध्यक्षा व स्थायी कमिटी अध्यक्षा आशा एहोळे यांनी दिले आहे. यासंदर्भात स्थायी कमिटी बैठकीत जि. पं. सदस्य जितेंद्र मादार यांनी आवाज उठवला. तसेच गेल्या काही महिन्यात खानापूर तालुक्यातील विकासकामांना अनुदानच मिळाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रामुख्याने जि. पं. अभियांत्रिकी विभाग, कृषी खाते, बागायत खाते, पशु संगोपण, मच्छ खाते, समाज कल्याण खात्यातर्फे तालुक्यात विविध योजना तसेच विकासकामे केवळ निधीअभावी रखडली आहेत. यामुळे सदर योजनांचे तालुक्यातील लाभार्थी हवालदिल झाले आहेत. बाकीच्या तालुक्यात अनुदान मंजूर होते. पण या बाबतीत खानापूर तालुक्यावर अन्याय का, असा सवाल सदस्य जितेंद्र मादार यांनी स्थायी कमिटी बैठकीत उपस्थित केला.
निधीअभावी कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱयांना मिळाला नाही. तसेच ग्रामीण भागात जि. पं. अभियांत्रिकी विभागाकडून घेण्यात येणाऱया गटारी रस्ते यासारखी कामेही रखडली आहेत. मच्छ विभागातर्फे जिल्हय़ातील इतर तालुक्यात मच्छ व्यावसायिकाना वाहने मंजूर केली. पण खानापूर तालुक्याकडे मात्र कानाडोळा झाल्याचे मत जितेंद्र मादारनी व्यक्त केले.
यावर्षी सदर योजनेतून 8 वाहने मंजूर केली. तसेच अनुशेष भरुन काढण्यासाठी आणखी आठ वाहने मंजूर करावी, अशी मागणी जितेंद्र मादार यांनी केली. ती मागणीही पूर्ण करण्याचे आश्वासन स्थायी कमिटी अध्यक्षांनी दिले.