ढगाळ वातावरणामुळे-वीट उत्पादकांची झोपच उडविली ः कच्चा माल झाकण्यासाठी धावपळ
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात सध्या वीट उत्पादनाचे काम जोरात सुरू आहे. पण यावर्षी वीट उत्पादक वेगवेगळय़ा कारणांमुळे आधीच अडचणीत आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही भागात पावसाच्या तुरळक सरीही पडल्या. गुरुवारी दुपारनंतर मात्र पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने वीट व्यावसायिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. पावसाला सुरुवात झाल्याने कच्च्या विटा झाकतेवेळी उत्पादकांच्या नाकीनऊ आली. पावसात बराच कच्चा माल भिजल्याने मोठे नुकसान झाले.
खानापूर तालुक्यात वीट उत्पादनाचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो. पूर्वी तालुक्यातच जळाऊ लाकूड तसेच मातीसह इतर कच्चा मालदेखील मोठय़ा प्रमाणात मिळत होता. यामुळे विटा तयार करण्यासाठी उत्पादन खर्चही कमी होता. पण आता वीट उत्पादनाच्या खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. वीट उत्पादनासाठी लागणारे जळाऊ लाकूड महाराष्ट्र किंवा कारवार भागातून आयात करावी लागते. त्याचे दरही भडकले आहेत. त्यातच गेल्यावर्षी तयार झालेल्या वीट उत्पादनाला बराच खर्च आला होता. पण वाळू टंचाईमुळे विटा खपविण्यात व्यावसायिकांना बरीच कसरत करावी लागली. पण गेल्या पाच-सहा महिन्यांत विटांना चांगला भाव मिळाला व उत्पादित मालहा विकला गेला. पण यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत अधूनमधून पाऊस सुरूच होता. यामुळे वीट उत्पादनास जवळपास एक महिना उशिराच सुरुवात झाली.
1 लाखापासून 10 लाखापर्यंत उत्पादन
प्रत्येक वीट उत्पादकाने आतापर्यंत कमीतकमी 1 लाखापासून 10 लाखापर्यंत विटांचे उत्पादन केले आहे. त्यातील जास्तीत जास्त माल भट्टीसाठी लावण्यात आला. काही उत्पादकांची नवीन तयार मालाची विक्री सुरू झाली. पण अद्याप एक महिना तरी विटा तयार करण्याचे काम सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसात वीट उत्पादकांचा बराच कच्चा माल तयार आहे. वीटभट्टी लावण्याची तयारी सुरू केली असतानाच अचानक निर्माण झालेले ढगाळ हवामान तसेच काही ठिकाणी पडलेल्या पावसाच्या सरीमुळे वीट उत्पादकांचे नुकसान झाले आहे. तर काही वीट उत्पादकांनी धावपळ करून तयार कच्चा माल प्लास्टिकने झाकण्यासाठी बरीच धावपळ केली आहे.
गेल्यावर्षी देखील याच हंगामात अचानकपणे वीट उत्पादित भागात पावसाच्या मोठय़ा सरी पडून वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वीट उत्पादकांकडून विशेष काळजी घेतली जात
आहे.
आता बऱयाच वीट उत्पादकानी कच्चा माल तयार केला आहे. पण वीटभट्टी लावण्यासाठी मजुराचा तुटवडा असल्याने मजूर शोधण्यासाठी देखील वीट उत्पादकांना धावपळ करावी लागत आहे. त्यातच गुरुवारी सकाळपासून मोठय़ाप्रमाणात ढगाळ हवामान होते. त्यामुळे कोणताही धोका होऊ नये, यासाठी या ना त्या मार्गाने कच्चा माल झाकण्यासाठी वीट उत्पादक प्रयत्नात होते. मात्र दुपारनंतर मोठय़ाप्रमाणात पाऊस झाल्यामुळे वीट उत्पादकांचे बरेच नुकसान होऊन फटका बसला आहे.