कोरोना बाधितांची संख्याही वाढत चालली : रविवारी 51 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात गेल्या 1 मार्चनंतर पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. सुरुवातीला तालुक्यात कोरोनाचा एखाद दुसरा रुग्ण सापडत होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या अधिकच वाढत चालली आहे. त्यातच आतापर्यंत चौघा कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामध्ये नंदगड येथील एक, बिजगर्णी (माचीगड) येथील एक तसेच जामगाव गावातील दोघा रुग्णांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी जामगाव येथील एका 54 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दुसऱया 60 वर्षीय कोरोना रुग्णावर बेळगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. पण तो रुग्णही रविवारी सायंकाळी दगावला.
त्यातच खानापूर तालुक्यात रविवारी एकाच दिवशी 51 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचा अधिक समावेश आहे.
अहवाल येण्यास उशीर
नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात तालुक्यात वेगळाच प्रकार घडत आहे. लक्षणे जाणवताच तपासणीसाठी नागरिक सरकारी दवाखान्याकडे धाव घेत आहेत. संशयितांची आरटीपीसीआर चाचणी केली जात असली तरी अहवाल येण्यासाठी उशीर लागत असल्याने मोठी अडचण होत आहे. तोपर्यंत संशयित रुग्णाला कोणतीच औषधे दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. अहवाल पाझिटिव्ह आल्यानंतरच उपचार सुरू केले जातात. दरम्यानच्या कालावधीत रुग्णाची प्रकृती आणखीनच खालावत असून उपचारांना होणाऱया दिरंगाईमुळे मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अहवालाच्या प्रतीक्षेत मोलाचा वेळ वाया न घालवता प्राथमिक लक्षणे जाणवणाऱया रुग्णांना चाचणी केलेल्या दिवसापासूनच औषधोपचार द्यावेत, अशी मागणी केली जात
आहे.
आरोग्य यंत्रणा सज्ज
खानापूर तालुक्यात कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात असली तरी आपत्कालीन प्रसंगी रुग्णसंख्या वाढल्यास या स्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तालुका रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरसह अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी खानापूरच्या दवाखान्यात 20 तसेच नंदगडमधील दवाखान्यात 10 असे एकूण 30 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. सध्या तालुक्यातील 128 उपचाराधीन रुग्णांवर घरातच उपचार सुरू आहेत. यापैकी कोणाचीही प्रकृती खालावल्यास पुढील उपचारासाठी त्यांची खानापूर सरकारी रुग्णालयात सोय करण्यात येत आहे.
तालुक्यात गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत 378 कोरोनाबाधित सापडले असून त्यापैकी 128 जण सक्रिय आहेत. उर्वरित रुग्णांची कोरोनामधून मुक्तता झाली आहे.
दररोज रुग्णसंख्येत वाढ
गेल्या आठवडय़ाभरात तालुक्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीने शंभरी गाठली होती. रोज सरासरी दहा ते पंधराच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. पण दहा दिवसांनंतर पुन्हा रुग्णसंख्येने पन्नासचा आकडा पार केल्याने आरोग्य खाते सतर्क झाले आहे. राज्यभर कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना खानापूर तालुक्यात मात्र कोरोनाची साथ नियंत्रणात होती. पण गेल्या आठ दिवसांपासून तालुक्याच्या सर्वच भागात साथीचा शिरकाव झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, यासाठी तालुका प्रशासन विविध पातळय़ांवर प्रयत्न करत आहे.