शिवसेनेचे खानापूर तालुका म. ए. समितीच्या दोन्ही गटांना आवाहन
प्रतिनिधी /खानापूर
येत्या सोमवार दि. 17 जानेवारीचा हुतात्मा दिन खानापूर तालुका म. ए. समितीच्या दोन्ही गटानी एकत्र येऊनच पाळावा, त्यामध्ये तालुक्यातील शिवसैनिकही सहभागी होतील, यामुळे तालुक्यात मराठी भाषिकातील ऐक्याचा संदेश पोहोचेल, असे आवाहन शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील व तालुका प्रमुख दयानंद चोपडे यांनी केले आहे.
यासंदर्भात आम्ही दोन्ही गटांच्या प्रमुखांची भेट घेऊन हुतात्मा दिनाच्या निमित्ताने का होईना, दोन्ही गटाला एकत्र आणणार आहोत, असेही उभयत्यांनी बोलताना सांगितले. खानापूर तालुक्यात म. ए. समितीमधील गटबाजीमुळे विशेषतः तालुक्यातील मराठी भाषिकांची मोठी हानी झाली आहे. आजही तालुक्यातील मराठी भाषिकांत म. ए. समिती विषयी आस्था असून, पुन्हा एकदा तालुक्यावर म. ए. समितीचा भगवाध्वज फडकवण्याची मराठी भाषिकांची नितांत इच्छा आहे. यासाठी म. ए. समितीच्या दोन्ही गटानी आपापसातील मतभेद बाजूला सारुन पुन्हा एकदा एकत्रित यावे, अशी आमची भावना असल्याचे मत के. पी. पाटील व दयानंद चोपडे यांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वीचा तालुक्यातील म. ए. समितीच्या इतिहासाचा आढावा घेतला असता, 1957 पासून 2018 पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ 2008 व 2018 चा अपवाद वगळता प्रत्येक वेळी म. ए. समितीचा उमदेवार विजयी झाला आहे. एवढेच काय एखाद दुसरा अपवाद वगळता तालुका पंचायतीवरही नेहमी म. ए. समितीचीच सत्ता राहिली आहे. पण 2008 साली म. ए. समितीमधील गटबाजीमुळेच भाजपचे प्रल्हाद रेमाणी यांच्या गळय़ात आमदारकीची माळ पडली होती. पण 2013 साली गटबाजी विसरुन म. ए. समिती एकसंघ झाली. आणि त्यावेळी म. ए. समितीचे उमेदवार अरविंद पाटील विजयी झाले. पण 2018 च्या निवडणुकीत पुन्हा म. ए. समितीमध्ये गटबाजी झाल्याने काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी विजयी संपादन केला
होता.
गटबाजी विसरा, एकत्र या
आता 2023 ची विधानसभा निवडणूक असो किंवा त्या आदी येणाऱया तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीच्या निवडणुका असोत, गटबाजी विसरुन म. ए. समितीचे दोन्ही गट एकत्र आले तरच म. ए. समितीला पुन्हा एकदा विजयाची संधी मिळणार आहे. मात्र अशीच गटबाजी राहिल्यास पुन्हा समितीला पराभवाचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. यामुळे हुतात्म्यांनी ज्या कारणासाठी बलिदान दिले. तो सीमाप्रश्न सुटावा, व सीमाप्रश्न सुटेपर्यंत होणाऱया निवडणुका असोत किंवा चळवळी असोत, यामध्ये यश येण्यासाठी दोन्ही गटानी एकत्र येऊन हुतात्मा दिन साजरा करणे व त्यानंतर दोन्ही गटात झालेले ऐक्य बळकट करणे हीच हुतात्म्यांना खऱया अर्थाने श्रद्धांजली ठरू शकेल. असे मतही त्या उभयत्यांनी व्यक्त केले असून, जाहीर झालेल्या अभिवादन कार्यक्रमानुसार एका गटाने सकाळी 8.30 वाजता तर दुसऱया गटाने सकाळी 9 वा. खानापूर स्टेशनरोडवरील कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर अभिवादन करण्यासाठी जमा होण्याचे आवाहन केले आहे. पण आता दोन्ही गटाने सकाळी 9 वाजता एकत्र येऊन हुतात्मा दिन साजरा करावा, त्यामध्ये शिवसैनिकही सहभागी होतील, अशी विनंती के. पी. पाटील व दयानंद चोपडे यांनी केली आहे.