रस्ते महामार्ग प्राधिकरणच्या बेजबाबदारपणाचा कळस : संपूर्ण रस्ता प्रवासासाठी धोकादायक : जोरदार पाऊस झाल्यास रस्ता वाहतुकीस बंद
- पाच वर्षांनंतरही शंभर खेड्यांतील नागरिकांची सुटका नाही
- 15 कि.मी.लांब दोन फूट चरीमुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक
- वळणांच्या ठिकाणी ना फलक, ना सूचना, ना काही खबरदारी
खानापूर / विवेक गिरी
खानापूर-रामनगर रस्त्याचे भाग्य उजळण्याचे लक्षण काही दिसत नाही. जोरदार पाऊस झाल्यास खानापूर-रामनगर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होणार हे स्पष्ट आहे. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्त्याच्या कंत्राटदाराचा बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे. यामुळे या भागातील शंभर खेड्यांतील नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. यावर्षीही यातून त्यांची सुटका झालेली नाही.
बेळगाव-पणजी व्हाया खानापूर चौपदरी रस्ता बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले होते. ई.पी.सी. या आधारे हा रस्ता तयार करण्यात येणार होता. बेळगाव ते खानापूर आणि खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत रस्त्याचे काम दोन कंत्राटदारांना देण्यात आले होते. यात बेळगाव ते खानापूर अशोका बिल्डकॉन तर खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत दिलीप बिल्डकॉन यांना रस्त्याचे काम देण्यात आले होते. बेळगाव-खानापूर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून खानापूर ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काम पर्यावरणवाद्यांच्या आणि वनखात्याच्या आडमुठ्या धोरणांमुळे चार वर्षे रेंगाळले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खानापूर ते गोवा हद्दीपर्यंतचे काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, दिलीप बिल्डकॉन कंपनीने माघार घेतल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा नव्याने निविदा काढून दुसऱ्या कंत्राटदाराला काम दिले. यात पुणे येथील व्ही. एम. म्हात्रे यांनी रस्त्याच्या कामाचे कंत्राट घेतले होते. मात्र, ज्या गतीने हे काम व्हावयास हवे होते, त्या गतीने म्हात्रे यांच्याकडून रस्त्याचे काम झालेले नाही.
यावषीही खानापूर ते रामनगर हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पाच वर्षांपासून हा रस्ता या-ना-त्या कारणाने कायमच रखडत आहे. मागील वषी ऑक्टोबरमध्ये म्हात्रे यांनी कंत्राट घेतल्यानंतर या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, म्हात्रे यांच्याकडूनही या कामाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. खानापूरपासून काही ठिकाणी एका बाजूला काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला दोन फूट खोल चर तयार झाल्याने हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. काही ठिकाणी पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्या ठिकाणी योग्य नियोजन व खबरदारी घेण्यात आली नसल्याने अत्यंत धोकादायक बनलेले आहे. खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत कामाच्या ठिकाणी कुठेही खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ताच प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. आठ दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने चिखलात वाहने घसरण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एका बाजूने तयार झालेल्या रस्त्यावरून एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नसल्याने चालकांना वाहन चालविणे अत्यंत कठीण बनले आहे. या ठिकाणी चालकाकडून थोडी जरी चूक झाल्यास मोठा अपघात घडण्याची शक्मयता आहे.
तयार एकेरी रस्त्यावरही धोका
याबाबत रस्त्याचे कंत्राटदार म्हात्रे यांचा बेफिकीरपणा दिसून येत आहे. येत्या दोन-चार दिवसात मोठा पाऊस झाल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होणार आहे. सावरगाळीपासून गुंजीपर्यंत एकेरी रस्ता तयार आहे. लोंढ्यापासून गुंजीपर्यंत एका बाजूने रस्ता तयार असून दुसऱ्या बाजूला दीड फूट खोलीची चर पंधरा किलोमीटरपर्यंत आहे. दुसऱ्या बाजूला चिखल झाल्याने तयार असलेल्या एकेरी रस्त्यावर वाहने समोरासमोर आल्यास ती घसरून अपघात होण्याची शक्मयता आहे.
पुलांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी अत्यंत धोकादायक स्थिती बनलेली आहे. ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे, तेथे एक किलोमीटरपर्यंत लहान वाहनांना जाण्यासाठी रस्ता काढण्यात आलेला आहे. त्या ठिकाणीही चिखल झाल्याने वाहतुकीस धोका आहे. खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत रस्त्यावर अंदाजे 35 वळणे आहेत. या ठिकाणी ना फलक, ना सूचना, ना काही खबरदारी घेण्यात आलेली आहे. साधे रिफ्लेक्टर लावून धोक्मयाची सूचनाही देण्यात आलेली नाही. ज्या ठिकाणी एकेरी रस्ता तयार केला आहे त्या बाजूने धोका टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. अपघात घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार, असाही प्र्रश्न प्रवासी विचारत आहेत. पाच वर्षांपासून अनेक कारणांमुळे या रस्त्याचे काम रखडले होते. कंत्राटदार म्हात्रे यांनी यशस्वी इन्फ्रा या कंपनीला सबकॉन्ट्रॅक्ट देऊन आपण नामानिराळे राहिले आहेत. यशस्वी इन्फ्रा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गसूचीप्रमाणे करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणही तितक्मया गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
रस्ते महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
पाच वर्षांपासून रस्त्याचे काम रखडलेले असताना पुन्हा नव्या कंत्राटदाराला काम दिल्यानंतर प्राधिकरणाने जातीने लक्ष घालून काम पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्याकडूनही दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय प्राधिकरण या संपूर्ण रस्त्याला जबाबदार आहे. सध्या सुरू असलेल्या संथ कामाबाबत तसेच संपूर्ण रस्त्यावर कोणतीही खबरदारी घेतली नसल्याबद्दल महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी किरण गुब्बनावर यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही नुकताच म्हात्रे यांना रस्त्याच्या कामाबाबत नोटीस दिली आहे. त्यांच्या उत्तरानंतर आम्ही सदर कंत्राटदार पुन्हा बदलणार आहोत, असे सांगितले. जर नव्याने कंत्राटदार नेमल्यास निश्चितपणे संपूर्ण काम रखडणार असल्याची चिन्हे आहेत. प्राधिकरणाच्या बेजबाबदारपणाचा कळस या रस्त्याबाबत दिसून येत आहे. बेळगाव-खानापूर रस्ता कंत्राटदाराने उत्तम रीतीने केला आहे. मात्र, खानापूर ते रामनगर-गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काम या-ना-त्या कारणांनी पाच वर्षांपासून रखडलेलेच आहे.
नितीन गडकरी लक्ष घालतील का?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भारतीय रस्त्यांबाबत छातीठोकपणे सांगत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार दररोज 30 किलोमीटरचा काँक्रीट रस्ता देशात बनवला जात आहे. मात्र पाच वर्षांपासून रखडलेल्या खानापूर ते गोवा हद्दीपर्यंतच्या 50 किलोमीटर रस्त्याबाबतही मंत्री गडकरी यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
हा रस्ता ई.पी.सी. या तत्त्वावर बनत असल्याने राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणच याला जबाबदार आहे. मात्र, रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी या रस्त्याबाबत केव्हाच गांभीर्याने घेत नसल्याचे चार वर्षांच्या अनुभवावरून दिसून येत आहे. खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत रस्त्यालगत असलेल्या शंभर गावांचा रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काम दिलेल्या वेळेत पूर्ण करणार
सध्या सुरू असलेल्या कामाबाबत म्हात्रे कंपनीचे अधिकारी निलेश कापसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या रस्त्याचे काम 2024 मे पर्यंत पूर्ण करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे हे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करणार आहोत. ज्या ठिकाणी धोकादायक स्थिती आहे, तेथे काही दिवसात योग्य उपाययोजना करणार आहोत, असे सांगितले.
बेळगावपासून खानापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. यात खानापूर व्हाया रामनगर, खानापूर व्हाया हेम्माडगा, जांबोटी-चोर्ला हे रस्ते आहेत. मात्र, या तिन्ही रस्त्यांची दुर्दशा झाली असून मुसळधार पाऊस झाल्यास या तिन्ही रस्त्यांवरून गोव्याला होणारी वाहतूक पूर्णपणे बंद होण्याचा धोका आहे. याबाबत कर्नाटक शासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच गोवा सरकारने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.