प्रतिनिधी/ खेड
निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील 567 घरांची पडझड झाली आहे. यात 57 अंशत:, तर 510 पक्क्या अंशत: घरांचा समावेश असून 42 गोठे जमीनदोस्त झाले आहेत. चक्रीवादळातील नुकसानीचा आकडा 35 लाख 66 हजारांवर पोहोचला आहे. अजूनही नुकसानग्रस्त गावांचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महावितरणने शर्थीच्या प्रयत्नानंतर खंडित वीज पुरवठा पूर्ववत केल्याने अंधारात चाचपडणाऱया ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. निसर्गच्या तडाख्यात शहरासह तालुक्यातील घरांची पडझड होऊन छतावरील पत्रेही उडून गेले. घरांवर झाडे कोसळून घरांची हानी झाली आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका खाडीपट्टय़ाला बसला असून या भागात घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. शिर्शी येथील तब्बल 150हून अधिक घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. देवाचा डोंगर येथील बाबू कोकरे यांच्या घराचे व गोठय़ाचे मिळून 1 लाख 40 हजार 500 रूपयांचे नुकसान झाले आहे.
नातूनगर येथील अशोक सखाराम सुतार, हीराचंद सहदेव सुतार, दत्ताराम तुकाराम सुतार यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून मोठी हानी झाली आहे. प्रमोद नारायण बेलोसे यांच्या घराचे पत्रे उडाले असून शशिकांत संभाजी जंगम, चंद्रकांत संभाजी जंगम, शिवाजी महादेव जंगम यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. येथील महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले आहेत. धामणदेवी, कशेडी, शिर्शी, देवाचा डोंगर, तुळशी बुद्रुक, खाडीपट्टा व अन्य गावातील घरांची पडझड होऊन मोठा फटका बसला आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त गावांचे पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तालुक्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला असून 150हून अधिक विद्युत खांब जमिनदोस्त झाले आहेत. यामुळे अर्धा तालुका अंधारातच चाचपडत होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी विद्युत खांब व वीजवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेत खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शहरातील काही भागासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा गुरूवारी रात्रीच्या सुमारास पूर्ववत होताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ग्रामीण भागातील बहुतांश वीजवाहिन्यांवर झाडे कोसळून वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठय़ाअभावी नळपाणी योजनाही बंद झाल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना चांगले हाल झाले. शुक्रवारी दिवसभर महावितरणकडून अनेकठिकाणी तुटलेल्या वीजवाहिन्या, वाकलेले खांब व नादुरूस्त विद्युत रोहित्र दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अजूनही काही गावे अंधारात चाचपडत असून याठिकाणचा वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी महावितरणची यंत्रणा दिवस-रात्र राबत आहे.
गेले दोन दिवस धुवाँधार कोसळणाऱया पावसाने शुक्रवारी दिवसभर उसंत घेतल्याने विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर आले आहे. पावसाळी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळल्याने गेले 2 दिवस ओस पडलेली बाजारपेठ गजबजली आहे. चक्रीवादळामुळे 2 दिवस ठप्प झालेली दूरध्वनी सेवा तिसऱया दिवशी सुरू झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. शासकीय व बँकातील कोलमडलेले दैनंदिन व्यवहारही पूर्वपदावर आले आहेत.