आंबा बागायतदारांच्या चिंतेत अधिकच वाढ
प्रतिनिधी/ खेड
दोन दिवस ढगाळ वातावरणासह खेडसह संगमेश्वर तालुक्यात बुधवारी सकाळच्या दरम्यान रिमझिम अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. अवकाळी सरी व वाढलेल्या उष्म्यामुळे कैरीची गळती होत असून आंबा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे.
खेड शहरासह ग्रामीण भागात बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास तुरळक पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अखेर पावसाचा शिडकावा सुरू होताच साऱयांचीच तारांबळ उडाली. 15 ते 20 मिनिटे पावसाचा शिडकावा सुरू होता. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
संगमेश्वरात वाढली गळ
संगमेश्वरः तालुक्यात बुधवारी सकाळच्या दरम्यान रिमझिम पावसाच्या सरी पडल्या. यावर्षी अवकाळी पावसामुळे काजू व आंबा मोहरावर मोठा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता, मात्र त्यानंतर थंडी पडली. त्यामुळे आंबा कलमांना चांगला मोहोर आला होता. त्यामुळे पीक चांगले येईल, अशी शक्यता होती. मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे गळ वाढली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
दापोलीत ढगाळ वातावरण
मौजेदापोलीः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तसेच वादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचे वेध दापोलीत दिसत असून गेले 2 ते 3 दिवस पूर्णतः ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे बागायतदार, शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. वादळी वारे, पाऊस आल्यास आंबा, काजू, नारळ, सुपारी या फळांचे नुकसान होण्याची भीती बागायतदार बाळगून आहेत. त्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसातील वातावरण बदलामुळे बागायतदार धास्तावले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकही पाऊस पडल्यास सुकी लाकडे, गुरांसाठी साठवलेला पेंडा भिजू नये, यासाठी प्लास्टिक कागदाच्या सहाय्याने झाकून ठेवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वातावरणातील बदलामुळे आजारपणही वाढत आहे. त्यातच कोरोनाचे संकट पुन्हा समोर येत आहे. त्यामुळे सर्वच बाजूने चिंता व्यक्त होत आहे.