भारताने विदेशातील खेळपट्टय़ांबाबत कधीही तक्रार केलेली नाही, शेवटच्या कसोटीसाठी पुन्हा फिरकी खेळपट्टीच
अहमदाबाद / वृत्तसंस्था
तिसऱया कसोटी सामन्यात मोटेराची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक असेल, असे स्पष्ट संकेत भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दिले. अहमदाबादमध्येच तिसऱया कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा दोन दिवसातच धुव्वा उडवल्यानंतर मोटेराच्या त्या खेळपट्टीवर विशेषतः इंग्लंडकडून बरीच टीका झाली. त्या पार्श्वभूमीवर रहाणे बोलत होता. भारतीय संघ विदेशात खेळतो, त्यावेळी तेथील खेळपट्टय़ा पूर्णपणे ओलसर असतात. पण, आम्ही त्याबद्दल कधीही तक्रार करत नाही, हे रहाणेने पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले.
‘चेन्नईतील दुसऱया कसोटीत जशी खेळपट्टी होती, तशीच खेळपट्टी अहमदाबादमधील तिसऱया कसोटी सामन्यात होती. दोन्ही खेळपट्टय़ांवर चेंडूला उत्तम फिरकी लाभली. मात्र गुलाबी चेंडूने अधिक फरक पडला. लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडू अधिक लवकर येतो. त्यादृष्टीने फलंदाजांना आवश्यक बदल करावे लागतात’, असे रहाणे म्हणाला. इंग्लंडविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यासाठी पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्टीच असेल, याचा त्याने येथे आवर्जून उल्लेख केला.
त्या मागणीचा देखील खरपूस समाचार
इंग्लंडच्या काही माजी खेळाडूंनी आयसीसीने याप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी थेट मागणी केली होती. त्याचाही रहाणेने येथे समाचार घेतला. तो म्हणाला, ‘ज्यांना जी मते मांडायची आहेत, त्यांना ती खुशाल मांडू द्यावीत. आमचा संघ ज्यावेळी विदेश दौऱयावर जातो, त्यावेळी तेथील खेळपट्टय़ा सीमला कशा पोषक असतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यावेळी ते फक्त भारतीय फलंदाजांच्या तंत्राबद्दल बोलतात. त्यामुळे, आता जी टीका केली जात आहे, ती फारशा गांभीर्याने पाहण्याची गरज नाही’.
‘आम्ही विदेशात खेळत असताना पहिल्या दिवशी खेळपट्टी ओलसर स्वरुपाची असते. ज्यावेळी त्यावर गवत ठेवले जाते, त्यावेळी चेंडूचा टप्पा पूर्णपणे अनाकलनीय होतो आणि त्यानंतर ती खेळपट्टी पूर्णपणे धोकादायक बनते. पण, आम्ही आजवर त्यावर एकदाही टिपणी केलेली नाही. याउलट, ज्यावेळी फिरकीला पोषक खेळपट्टी असते, त्यावेळी त्यावर एका लाईनने खेळणेही पुरेसे असते. चेंडू खूपच वळत असेल तर त्याबद्दल वेगळा विचार करण्याची गरज नसते’, असे त्याने पुढे नमूद केले.
उमेश यादव पूर्ण तंदुरुस्त
‘आम्हाला इंग्लिश संघाचा आदर आहे. त्यांचा संघ उत्तम आहे. आम्ही शेवटच्या दोन कसोटी सामन्यात उत्तम खेळलो आणि त्यापूर्वी पहिल्या कसोटीत इंग्लंडचा खेळ सरस झाला होता. आम्ही आताही त्यांना हलकेपणाने घेत नाही. दोन्ही संघ जिंकण्यासाठीच मैदानात उतरत असतात. उमेश यादव पूर्ण तंदुरुस्त आहे आणि सराव सत्रात त्याने पूर्ण ताकदीने सहभाग घेतला. त्याच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी आणखी भक्कम होईल’, असे रहाणेने शेवटी स्पष्ट केले.